
मायावतींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती; पण..
CBI, ED ला घाबरुनच मायावतींनी निवडणूक लढवली नाही : राहुल गांधी
यूपी निवडणुकीत (UP Election) दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मोठा खुलासा केलाय. निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congress) बसपासोबत (BSP) युती करायची होती. मायावतींनाही (Mayawati) मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही, असं राहुल गांधींनी सांगितलंय.
यावेळी मायावतींनी निवडणूक लढवली नसल्याचंही राहुल गांधी म्हणाले. मायावतींना आमच्या बाजूनं युतीची ऑफर देण्यात आली होती. त्या मुख्यमंत्री होऊ शकतात, असंही आम्ही म्हंटलं होतं. पण, त्यांनी आमच्या ऑफरला कोणताही प्रतिसाद दिला नाही. मायावतींनी ईडी, सीबीआयच्या भीतीनंच निवडणूक लढवली नसल्याचंही ते म्हणाले.
राहुल गांधी पुढं म्हणाले, आम्हाला कांशीराम (Kanshi Ram) यांच्याबद्दल खूप आदर आहे. त्यांनी दलितांना सशक्त केलंय. काँग्रेस कमकुवत झाली आहे; पण हा मुद्दा नाहीय. सध्या दलितांना सक्षम बनवण्याची गरज आहे. पण, असं असताना मायावती म्हणतात आम्ही लढणार नाही. रस्ता पूर्णपणे मोकळा आहे, पण CBI, ED, Pegasus मुळं त्यांना लढायचं नाहीय. आता निवडणूक निकालानंतर राहुल गांधींच्या या वक्तव्याचा अर्थ बरंच काही सांगून जात आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेस आणि बसपा हे दोन्ही पक्ष स्वबळावर एकटेच लढले होते. या निवडणुकीत दोन्ही पक्षांचा सफाया झाला. एकीकडं काँग्रेसनं दोन जागा जिंकल्या आहेत, तर मायावतींच्या बसपानं सर्वात वाईट कामगिरी करत केवळ एकच जागा जिंकलीय. यूपी निवडणुकीत बसपच्या खराब कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर यावेळी पक्षाला 10 टक्के कमी मते मिळाली आहेत. 2017 मधील 22 टक्क्यांवरून बसपाचा मतसाठा 12 टक्क्यांनी कमी झालाय आहे.