काश्मीर प्रश्नावर मोदी सरकार आज घेणार मोठा निर्णय

Modi-Shah
Modi-Shah

श्रीनगर : गेल्या आठवड्यापासून केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणेत वाढ केल्याने काहीतरी मोठे होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) सकाळी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत काश्मीरबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या घटनात्मक तरतुदी रद्द करण्याच्या हालचालींना विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांच्या रविवारी (ता.4) झालेल्या बैठकीत प्रस्तावित बदलांना विरोध करण्याचा निर्णय एकमताने घेत तसा ठरावही केला आहे. 

राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानी होणारी ही बैठक ऐनवेळी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. फारुख अब्दुल्ला यांची तब्येत बरी नसल्याने हा बदल करण्यात आला. या बैठकीमध्ये कलम 35 अ आणि कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यात आला. तसेच, ही कलमे रद्द केल्यास राज्यावर कोणते विपरीत परिणाम होऊ शकतात, त्याची माहिती देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिष्टमंडळ पाठविण्याचा ठरावही संमत करण्यात आला.

हे शिष्टमंडळ इतर पक्षांच्या नेत्यांचीही भेट घेत त्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करणार आहे. या बैठकीला मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, कॉंग्रेसचे नेते ताज मोहिउद्दीन, 'पीडीपी'चे नेते मुझफ्फर बेग, पीपल्स कॉन्फरन्स पक्षाचे नेते सजाद लोन अणि इम्रान अन्सारी, माकपचे नेते एम. वाय. तारीगामी हे उपस्थित होते. तसेच, भारतीय प्रशासकीय सेवेतून बाहेर पडत जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट या राजकीय पक्षाची स्थापना करणारे शाह फैझलही या वेळी उपस्थित होते. 

काश्‍मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केल्यानंतर येथे चर्चांना उधाण आले आहे. सरकार कलम 35 अ आणि कलम 370 रद्द करणार असून, त्यासाठीच ही तयारी सुरू असल्याची शंका काही विरोधकांनी व्यक्त केली असली, तरी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मात्र केवळ सुरक्षेसाठी ही काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. अमरनाथ आणि इतर धार्मिक यात्रांना आलेले यात्रेकरू आणि पर्यटकांना माघारी फिरण्यास सरकारने सांगितले आहे. अमरनाथ यात्रामार्गावर शस्त्रसाठा सापडल्याने लष्कर अधिक सावध झाले आहे. 

शांततेचे आवाहन 
जम्मू आणि काश्‍मीरमध्ये तणाव निर्माण होऊन संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल, अशी कोणतीही पावले भारत आणि पाकिस्तान यांनी उचलू नयेत, असे आवाहन या प्रादेशिक पक्षांनी या वेळी केले. तसेच, राज्यातील नागरिकांनाही शांतता राखण्याचे आवाहन या नेत्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com