नवी दिल्ली - तृणमूल कॉंग्रेसचे एक संस्थापक असलेले पश्चिम बंगालचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात सहभागी झाले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मिशन गुजरातमधून वेळ काढून दिल्लीत येऊन रॉय यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर काम करणे अभिमानास्पद आहे, असे रॉय यांनी सांगितले.
रॉय यांनी गेल्या महिन्यातच "तृणमूल'ला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, भाजपने त्याआधीपासून त्यांच्यावर जाळे फेकले होते.
जाणकारांच्या मते रॉय यांच्या अधिकृत भाजपप्रवेशामुळे ममता बॅनर्जी यांना बंगालमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता नसली, तरी रॉय यांचे समर्थक तृणमूलमध्ये आजही मोठ्या संख्येने आहेत. शिवसेना ते लालूप्रसाद ते आम आदमी पक्षापर्यंत मोदी विरोधकांची राष्ट्रीय आघाडी स्थापन करण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत फिरणाऱ्या ममता यांना बंगालमध्येच जखडून ठेवण्याची एक चाल भाजपने रॉय यांच्या रूपाने खेळल्याचे मानले जाते. भाजप मुख्यालयात संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात शहा यांनी रॉय यांचे स्वागत केले. या वेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद व भाजपचे प. बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय उपस्थित होते.
एकेकाळी ममता यांचे सर्वांत विश्वासू मानले जाणाऱ्या रॉय यांच्याशी अलीकडे मतभेद वाढत गेले. रॉय यांनी 19 ऑक्टोबरला तृणमूल सोडला होता. ममता यांनी त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले होते. त्यानंतर रॉय व विजयवर्गीय यांच्यात दुर्गापूजेवेळी दीर्घ खलबते झाली, तेव्हाच रॉय भाजपचा हात धरणार हे स्पष्ट झाले होते.
बहुचर्चित सारदा घोटाळ्यात रॉय हे आरोपी आहेत. त्यांना तुरुंगवासही झालेला आहे. भाजपमध्ये आल्याने त्यांच्यामागचे तपास शुक्लकाष्ठही थंडावण्याची चिन्हे आहेत. या आरोपांवर त्यांनी कायदा आपले काम करेल, एवढेच उत्तर दिले. आगामी निवडणुकीत भाजप बंगालमध्ये सर्वांत मोठा व सत्तारूढ पक्ष होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शहा यांनी काही महिन्यांपूर्वी ममतांवर शरसंधान करताना, उघडेवाघडे होऊन कॅमेऱ्यासमोर लाखो रुपये लाच घेणारे तृणमूलचे नेते, असा जो उल्लेख केला होता, त्या नेत्यांत रॉय हेही होते, हे विशेष.
|