मुंबई - गोवा क्रुझ सेवा दोन महिन्यानंतर सुरू 

cruse
cruse

पणजी : मुंबई - गोवा जलमार्गावरील क्रुझ सेवेची चाचणी पूर्ण झाली असून पावसाळ्यानंतर येत्या दोन महिन्यात ती सुरू होणार आहे. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कामही द्रुतगतीने सुरू असून पुढील वर्षी मार्चपर्यंत लोकार्पण करण्याचे अपेक्षित आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

गोव्यातील मांडवी पुलाच्या नदीवरील शेवटची कमान जोडण्याचे उद्‌घाटन केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या आज हस्ते पणजीत झाले त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईत सध्या सुमारे 1 हजार कोटींचे क्रुझ टर्मिनल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबईत दरवर्षी सरासरी सुमारे 80 क्रुझ बोटी येतात व गोव्यातही सुमारे 70 क्रुझ बोटी येतात. या टर्मिनलमुळे सुमारे 950 क्रुझ बोटी येतील. या टर्मिनलमुळे मुंबई तसेच गोव्याच्या पर्यटनात भर पडणार आहे. पर्यटनात वाढ करण्यासाठी लवकरच मुंबईतील टुर्स व ट्रॅव्हल्स कंपन्यांची कार्यशाळा बोलावण्यात येणार आहे तसेच गोव्यातील टुर्स व ट्रॅव्हल्सनाही आमंत्रित केले जाणार आहे. गोवा, कोचीन, अंदमान निकोबार तसेच बाली येथील पर्यटनात वाढ होईल. दरवर्षी सुमारे 1 लाख भारतीय क्रुझ पर्यटनसाठी सिंगापूरला जातात. त्यामुळे ही सेवा भारतातूनच उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे, असे गडकरी यांनी सांगितले. 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे मुंबई - गोवा महामार्गाचे कामे सुरू आहेत व अनेक एक्‍स्प्रेस महामार्गांचे कामे पूर्ण झाली आहेत. दिल्लीतील 14 पदरी महामार्गाचे काम वेळेपूर्वीच पूर्ण झाले आहे त्यामुळे या मुंबई - गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होईल मात्र कशेडी घाटातील बोगद्याचे काम काहीसे मागे राहू शकते. "भारत माला' अंतर्गत 24 हजार किलोमीटरचे सुमारे साडेसात कोटींचे काम येत्या डिसेंबरपूर्वी सुरू केले जाईल तर "सागर माला' अंतर्गत 12 मुख्य बंदरांच्या कामासाठी सुमारे 16 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यातील 4 लाख कोटी रुपये जुन्या बंदरांच्या नुतनीकरणासाठी तसेच बंदर जोडणी या कामासाठी करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारला या बंदर प्रकल्पामधून दरवर्षी चांगला नफा झाला आहे असे गडकरी यांनी माहिती दिली. 

देशात रोजगार उपलब्ध करण्यासाठी मच्छिमारी करण्याची कक्षा 11 नॉटिकल मैल ऐवजी आता ते 200 नॉटिकल मैलपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक ट्रॉलर्स बांधण्यात येत आहे. 200 ट्रॉलर्स तामिळनाडूला देण्यात आल्या आहेत तर कोचीन येथे बांधण्यात येत असलेल्या या ट्रॉलर्सची किंमत सव्वाकोटी रुपये आहे. या ट्रॉलर्स मच्छिमारांनाच देण्यात येणार आहेत. यामुळे मासे मिळण्याचे उत्पादन वाढेल व निर्यातही वाढून रोजगारही उपलब्ध होईल. पर्यावरण व अर्थव्यवस्था हे अतिमहत्त्व आहे. यातून संतुलित पर्याय काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रदूषण रोखण्यासाठी जलवाहतूक तसेच इलेक्‍ट्रीकल व इथोनेलचा वापर करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com