'सीएम'ला वाचवायला 'पीएम' मैदानात! 

Vijay Rupani
Vijay Rupani

राजकोट : भारतीय राजकारणाला वेगळे वळण पाच वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे लागले होते. नरेंद्र मोदी यांनी ती निवडणूक जिंकून लागोपाठ तिसऱ्यांदा गुजरातमध्ये आपलाच शब्द चालतो, हे दाखवून दिले आणि भाजपला त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करणे भाग पडले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपपुढे उभ्या केलेल्या कडव्या आव्हानामुळे, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याच मुख्यमंत्र्याला वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना राजकोटमध्ये येणे भाग पडले आहे. 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी राजकोट या भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उभे असले तरी यंदा कॉंग्रेसचे उमेदवार आणि राजकोटमधील बडे उद्योजक इंद्रनील राज्यगुरू यांनी त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. रूपाणी यांच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे, हे शनिवारीच राज्यगुरू यांचे बंधू दिव्यनील यांच्यावर झालेल्या हल्ल्यातून स्पष्ट झाले होते. त्यानंतर इंद्रनील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्या भेटीस गेलेले कॉंग्रेस महासमितीचे सरचिटणीस राजीव सातव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही पोलिसांनी मारहाण केली. अखेर दिव्यनील राज्यगुरू यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात पाच जणांना अटक झाली, तेव्हा ते भाजपचेच कार्यकर्ते असल्याचे निष्पन्न झाले. 

त्यातच गेल्याच आठवड्यात पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्या राजकोटमध्ये झालेल्या सभेची तुफानी गर्दी बघून, अखेर विजय रूपानी यांनी थेट पंतप्रधानांना साकडे घातले आणि आपल्याच मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रचाराच्या राजकोटमध्ये येणे मोदी यांना भाग पडले. सायंकाळच्या पाचच्या सभेस मोदी हे तीन तास उशिरा म्हणजे रात्री आठनंतर पोचले आणि त्यांना प्रतिसादही मोठा मिळाला. तोपावेतो सभेत "राजकोट ना बेटा (म्हणजे विजय रूपाणी) गुजरात ना नेता; गुजरात ना बेटा देश ना नेता!' अशा घोषणा व्यासपीठवरून देण्यात येत होत्या. मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. 

दस्तुरखुद्द मोदी सभास्थानी आल्यावर गर्दीत उत्साह जरूर संचारला; पण पुढे साडेआठनंतरही पंतप्रधानांनी गुजरात तसेच राजकोट येथील स्थानिक प्रश्‍नांचा उल्लेख न करता, जागतिक बॅंक, "मुडीज', "इज ऑफ डुइंग बिझिनेस' अशा विषयांवरच बोलणे पसंत केल्यावर अखेर गर्दीने तेथून काढता पाय घ्यायलाच सुरुवात केली! 

हीच हवा तारेल... 
मोदी यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस "कॉंग्रेसची उत्तर प्रदेशात जशी धूळधाण झाली, तशीच गुजरातेतही होईल,' अशी भविष्यवाणी उच्चारली. मात्र, निवडणुकीतील पहिल्या टप्यातील प्रचाराच्या अखेरच्या रविवारी राजकोट तसंच सुरेन्द्रनगर आणि आमोद येथील सभांमधील मोदी यांच्या भाषणाचा सूर बघता विकासाचा मुद्दा पार दूरवर फेकला गेल्याचेच दिसून आले. याचा अर्थ स्पष्ट आहे. प्रचाराच्या पुढच्या अंतिम टप्प्यातही भाजप आणि मोदी हे "विकास' बाजूला ठेवून राहुल आणि त्यांची घराणेशाही यांनाच लक्ष्य करणार आणि "हीच हवा आम्हाला तारून नेईल,' असे एका भाजप कार्यकर्त्याने बोलूनही दाखवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com