Nehru Death anniversary : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जेवढे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत, तेवढ्याच त्यांच्या आवडी-निवडी, सुसंस्कृतपणा, त्यांचे छंद आणि त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता हे सुद्धा चर्चेचे विषय ठरले आहेत. त्यांचे वडील पंडित मोतीलाल नेहरू हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठाही तितकीच होती. पंडित मोतीलाल यांचे प्रयागराजमधील सध्याचे आनंद भवन हे त्याच्या वैभवाचे आणि ऐतिहासिक वारशाचे द्योतक आहे.
त्यांची नात नयनतारा सहगल यांनी आनंद भवनाबद्दल लिहिलंय की "माघ मेळ्याच्या वेळी गंगा आणि यमुनेच्या संगमावर स्नान केल्यानंतर, जवाहरलाल नेहरूंना पाहण्यासाठी हजारो लोक येथे जमत असत." यावरून जवाहरलाल आणि त्यांच्या आनंद भवनाची प्रतिष्ठा लक्षात येते.
स्वराज भवन, जिथे असहकार आंदोलनाचा पाया घातला गेला
जवाहरलाल नेहरूंचे हे मुख्य निवासस्थान होतं. हेच घर स्वातंत्र्य लढ्याचा सर्वात मोठा आधार होता. असहकार चळवळीचा पाया इथूनच रचला गेला. हे घर अगदी भव्य होतं. आता ते एक संग्रहालय आहे. हे घर देशाला समर्पित करण्यात आलंय. वास्तुविशारद आभा नारायण लांबा 2013 पासून त्याची देखभाल करत आहेत. त्या सांगतात, विश्वस्त असलेल्या सोनिया गांधींनी देखील या घराची पूर्ण काळजी घेतली आहे.
मोतीलाल नेहरूंनी स्वराज भवन 20,000 रुपयांना विकत घेतलं होतं. पूर्वी त्या घराचं नाव होतं महमूद मंझिल. स्वराज भवनात एकूण 42 खोल्या होत्या. 1920 च्या दशकात कोट्यवधींची ही संपत्ती भारतीय काँग्रेसला दान करण्यात आली.
सिव्हिल लाइन्सजवळ त्यांनी आणखी एक मोठी मालमत्ता खरेदी केली होती. त्या घराचं नाव त्यांनी आनंद भवन असं ठेवलं होतं. त्यात एकाहून एक अनोख्या आणि मौल्यवान वस्तू आणि फर्निचर होते. आनंद भवनाचे फर्निचर युरोप आणि चीनमधून आणले होते. 1970 मध्ये इंदिरा गांधी यांनी ट्रस्ट स्थापन करून हे घर देखील देशाला समर्पित केलं.
नेहरूंची देशभरात किती मालमत्ता होती?
एका आकडेवारीनुसार, 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर पं. जवाहरलाल नेहरूंची संपत्ती सुमारे 200 कोटी होती आणि त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीपैकी 98 टक्के संपत्ती देशाला समर्पित केली होती. नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा त्यांची गणना देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये व्हायची. यानंतर त्यांनी देशाच्या उभारणीसाठी आपली संपत्ती दान केली.
देशाच्या नावावर मोठी देणगी देण्याची ही घटना 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची आहे. अनेक उद्योगपतींनी देशाच्या विकासासाठी आपली संपत्ती दान केली होती, त्याचवेळी जवाहरलाल नेहरूंनीही आपल्या संपत्तीपैकी 98 टक्के संपत्ती दान केली होती. तेव्हा आनंद भवन सोडून त्यांच्याकडे 200 कोटींची संपत्ती होती.
पटेल यांनी नेहरूंच्या देणगीबद्दल सांगितलं होतं
नेहरू आणि पटेल यांच्यात मतभेद होते असं अनेकदा सांगितलं जातं, यात नवनवीन तथ्य समोर आणली जातात. पण सरदार पटेलांनी नेहरूंच्या देणगीचं कौतुक केलं होतं हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्यांनी लिहिलंय की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नेहरूंपेक्षा जास्त दान कोणत्याही इतर व्यक्तीने केलेलं नाही आणि नेहरूंच्या कुटुंबाप्रमाणे भारतीय स्वातंत्र्यासाठी कोणत्याही कुटुंबाला सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला नाही.
त्यांनी पुढे लिहिलंय की, मोतीलाल नेहरूंनी आपली उपजीविका सोडली, आपलं भव्य घर स्वातंत्र्य चळवळीतील सैनिकांच्या हवाली केलं. आणि स्वतः मात्र एका छोट्या घरात राहायला गेले.
देशातील नेहरूंच्या नावावर असलेल्या संस्था
2013 मध्ये माहितीच्या अधिकारात उघड झालंय की देशभरात नेहरू-गांधी कुटुंबाच्या नावावर 450 योजना, इमारती, प्रकल्प आणि संस्था आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावाने देशात अनेक शैक्षणिक संस्था उघडल्या गेल्या. अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यापैकी उच्च शिक्षणासाठी दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि मुलांच्या शिक्षणासाठी देशभरात जवाहर नवोदय विद्यालय आहे.
याशिवाय जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च पॉंडिचेरी, जवाहरलाल भारती कॉलेज कवली आंध्रप्रदेश, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च बंगलोर कर्नाटक, जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ जबलपूर मध्यप्रदेश, जवाहरलाल नेहरू नॅशनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शिमोगा कर्नाटक आदी संस्था आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.