चेन्नई - भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा झालेला रहस्यमय मृत्यु हा भारतीय जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय... क्रांतिकारकांचे अग्रणी असलेले भारतभूषण सुभाषबाबु खरेच "त्या' विमान अपघातात मरण पावले होते का?; की त्यांनी या अपघातानंतर एका "वेगळ्या प्रवासास' सुरुवात केली?? सुभाषबाबुसंदर्भातील या व अशा अनेक प्रश्नांनी भारतामधील विविध सरकारांना गेल्या अर्धशतकापेक्षा जास्त काळापासून अक्षरश: भंडावून सोडले आहे.
सुभाषबाबु यांच्या नाहीशा होण्यासंदर्भातील या रहस्याची चौकशी करण्यासाठी भारतामध्ये शाह नवाझ समिती (1956), खोसला आयोग (1970) आणि मुखर्जी आयोग (1999) असे आयोग नेमण्यात आले. यांमधील शाह नवाझ समिती व खोसला आयोगाने सुभाषबाबुंना 18 ऑगस्ट, 1945 रोजी जपानच्या ताब्यातील तैहोकु विमानतळावर झालेल्या अपघातात मृत्यु आल्याचा निर्वाळा दिला होता; तर मुखर्जी आयोगाने मात्र सुभाषबाबुंचा मृत्यु त्या अपघातामध्ये झाला नसल्याचे ठामपणे सांगितले. तत्कालीन सरकारने मुखर्जी आयोगाचा हा दावा अर्थातच फेटाळून लावला. थोडक्यात, गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळाच्या या प्रयत्नांनंतर सुभाषबाबुंच्या मृत्युसंदर्भातील रहस्याचे समाधानकारक उत्तर मिळू शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर, सुभाषबाबुंचा मृत्यु विमान अपघातामध्ये झाला नसल्याची शक्यता आणखी गडद करणारा पुरावा पॅरिसमधील एक इतिहासकार जे बी पी मोर यांच्या हाती लागला आहे.
"सुभाषबाबु यांना विमान अपघातामध्ये मरण आले नाही; आणि ते 1947 मध्येही जिवंत होते. या अपघातामधून वाचलेल्या सुभाषबाबु यांनी "इंडोचायना'मध्ये आश्रय घेतला,' अशा आशयाचा फ्रेंच गुप्तचर खात्याचा अहवाल मोर यांच्या निदर्शनास आला आहे. सुभाषबाबु हे मृत झाल्याच्या वृत्तावर फ्रेंच गुप्तचर खात्याने विश्वास न ठेवल्याचे स्पष्ट आहे, असे प्राध्यपक मोर यांनी या पार्श्वभूमीवर सांगितले.
तत्कालीन इंडोचायना (आताचा व्हिएतनाम) ही 1940 च्या दशकांत फ्रेंच वसाहत असल्याने फ्रान्सच्या यासंदर्भातील भूमिकेविषयी कायमच उत्सुकता व्यक्त करण्यात आली होती. सुभाषबाबु हे विमान अपघातामध्ये मरण पावल्याचे ब्रिटीश व जपानी सरकारतर्फे सांगण्यात आले होते. मात्र तत्कालीन फ्रेंच सरकारने कायमच या विषयासंदर्भात मौन बाळगले. या पार्श्वभूमीवर आढळून आलेल्या या संवेदनशील अहवालास अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
या अहवालासंदर्भात आता भारतामधील सरकारच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमयी मृत्यूचे गूढ यापुढेही कायम राहणार आहे. त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर मांडण्यात आली होती. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत न्यायमूर्ती मुखर्जी आयोगाने दिलेला अहवाल केंद्र सरकारने फेटाळला असून, त्याआधारे मृत्यूच्या चौकशीची मागणी करणे सयुक्तिक नसल्याचे कारण देत न्यायालयाकडून ही याचिका फेटाळण्यात आली होती.
ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
|