कोलकता - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. त्याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात असताना जपानमधील मंदिरात ठेवलेल्या त्यांच्या रक्षेची डीएनए चाचणी करण्याची विनंती नेताजींच्या कन्या अनिता बोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी केली.
नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलावे, अशी पूर्वीच्या सरकारची अजिबात इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, असा आरोप अनिता बोस यांनी या वेळी केला. त्यांच्या मृत्यूची खरी माहिती उजेडात यावी, यासाठी जपानमधील रेनकोजी मंदिरात जतन केलेल्या नेताजींच्या रक्षेची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यास पंतप्रधान मोदी जे प्रयत्न करीत आहेत, त्याचे कौतुक अनिता बोस यांनी केले. जर वेगळे काही पुरावे हाती आले नाहीत, तर माझ्या वडिलांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात झाला असावा, असे मला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. नेताजींच्या रक्षेची डीएनए चाचणी करण्याची विनंती करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
|