राजधानी नवी दिल्ली झालीये गॅस चेंबर!

राजधानी नवी दिल्ली झालीये गॅस चेंबर!

नवी दिल्ली - तुम्ही येत्या आठवड्यात दिल्लीत येणार असाल, तर तूर्त प्लॅन रद्द करा. कारण, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला सध्या महाविषारी धुराचा (स्मॉग) गच्च विळखा पडला आहे. धुक्‍यासारखेच दिसणारे; पण रासायनिक कण, गॅस व धुरापासून बनलेले हे मिश्रण दिल्लीत भरदिवसाही रात्रीचे वातावरण निर्माण करत आहे. मानवी आरोग्याला अत्यंत हानिकारक असलेल्या या धुराने दिल्लीत राहणाऱ्यांना श्‍वास घेणेही कठीण बनले आहे. या मुद्द्यावर पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांनी उद्या (ता. 4) दिल्ली, पंजाब व हरियाना या राज्यांच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. याचा उपाय मात्र हतबलतेच्या दिशेनेच दिसतो आहे.

राजकीय पक्षांना दिल्लीतील सामान्यांच्या आरोग्याबाबत आस्था किती, हा सनातन प्रश्‍न असला, तरी संसदेचे अधिवेशन तोंडावर आल्याने मायबाप केंद्र सरकार मात्र स्मॉगच्या संकट निवारणासाठी तातडीने प्रयत्नांना लागले आहे. मागील दोन वर्षी स्मॉगच्या या संकटावर मात करण्यासाठी केंद्राने आधीच बैठका घेतल्या होत्या व दिल्ली सरकारनेही "सम-विषम'सारखी योजना राबविली होती. यावेळेस तशा हालचालीही नाहीत. दवे यांनी उद्या बैठक बोलावली असली, तरी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत संबंधितांना ज्या नोटिसा बजावायला हव्यात त्याबाबत पर्यावरण मंत्रालय मौनात गेले आहे.

दिल्लीत ऑक्‍टोबर संपता संपता धुक्‍यासारख्या दिसणाऱ्या स्मॉगचे साम्राज्य सुरू होते. मात्र, यावेळची स्थिती "गंभीर' हा शब्दही कमी पडावा अशी आहे. पुढचा आठवडाभर स्मॉगमुळे दिल्लीकर तडफडतच जगणार हेही स्पष्ट आहे. माजी सैनिकाच्या आत्महत्येचे राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांना ते जाणवत नसले तरी या गॅस चेंबरमध्ये राहणाऱ्या सामान्यांची अवस्था अक्षरशः भीषण झाली आहे. एखाद्या बेसिनसारखी नैसर्गिक स्थिती असेलल्या दिल्लीत सध्या वाहत्या वाऱ्याचेही प्रमाण शून्यावर आल्याने हा धूर हटण्याचे नाव घेत नाही व घेणारही नाही.

उन्मादाचा परिणाम...
दिल्लीतील या अवस्थेला जबाबदार हरियाना, पंजाब व खुद्द दिल्लीकरही आहेत. दिवाळीला कोट्यवधींचा धूर करण्यात पुरुषार्थ मानणाऱ्या दिल्लीकरांना त्याच्या परिणामांची जाणीव नसून, दिवाळीचा उन्माद दरवर्षी वाढत चालला आहे. पंजाब व हरियानात रब्बी पिकांच्या कापणीनंतर उघड्यावर जाळल्या जाणाऱ्या कचऱ्याचा धूर पहिला पडाव थेट दिल्लीतच टाकतो. दिल्लीत गेले दोन दिवस दृश्‍यमानता 100 ते 200 मीटर इतकी अत्यल्प झाली आहे. यामुळे दहा पावलांवरील काहीही दिसू शकत नाही व धूर फेकत जाणाऱ्या वाहनांना दिवसाही दिवे लावून जाण्याची वेळ आली आहे. हा विषारी धूर हटण्यासाठी मुख्यतः खेळती हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश यांची गरज असते. मात्र, दिल्लीत सध्या वारे वाहण्याचा दर ताशी वेग 0 ते 0.5 इतका मंदावल्याने आणि सूर्याच्या किरणांना स्मॉगने अडविल्याने याबाबतही हतबल परिस्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com