file photo
file photo

ओखी वादळ ओसरल्याने सुटकेचा निःश्‍वास

नवी दिल्ली/अहमदाबाद: दक्षिण भारताच्या किनारपट्‌टीवर धुमाकूळ घालणाऱ्या आणि गुजरातसाठी संकटाचे ढग जमा करणाऱ्या ओखी चक्रीवादळाची तीव्रता काल रात्री कमी झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. सुरवातीला सुरतच्या जवळ गुजरातच्या किनाऱ्यावर वादळ धडकण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार सुरतच्या दक्षिण-पश्‍चिम किनारपट्टीपासून 240 किलोमीटर अंतरावर ओखी चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. वादळाच्या तीव्रतेत 18 किलोमीटर प्रतितास घट झाल्याने गुजरातवरील संकट टळल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

काल मध्यरात्री ओखीची तीव्रता कमी झाल्याने गुजरातच्या किनाऱ्यावर येईपर्यंत तो सामान्य होईल, असे हवामान खात्याने सांगितले. मात्र किनारपट्टीवर वादळ येण्याचा इशारा हवामान खात्याने मागे घेतलेला नाही. कारण अजूनही समुद्रात वेगाने वारे वाहण्याचा आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याचे संचालक जयंत सरकार म्हणाले, की चक्रीवादळ अगोदरच कमकुवत झाले असून, ते आणखी कमकुवत होईल. चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यामागे हिवाळ्यातील वातावरण कारणीभूत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मात्र हेच वादळ पावसाळ्यात किंवा त्याअगोदर आले असते, तर स्थिती वेगळी दिसली असती. तत्पूर्वी मुंबईत ओखी वादळाचा प्रभाव काल दिवसभर जाणवला. सोमवार रात्रीपासूनच होणाऱ्या पावसामुळे मुंबई शहरातील जनजीवन विस्कळित झाले होते. दुसरीकडे गुजरातमध्ये निवडणुकीचा ज्वर चढलेला असताना ओखी वादळाचा परिणाम झाला. बिघडलेल्या वातावरणामुळे राजकीय पक्षांना प्रचाराच्या वेळापत्रकात बदल करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरतमधील सभा वादळामुळे रद्द करावी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com