
'दहशतवाद्यांकडून काश्मिरी तरुणांची भर्ती, भाजप नेते टार्गेटवर' : NIA आरोपपत्र
नवी दिल्ली : ''जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर गोंधळलेल्या पाकिस्तानने दहशतवादासाठी काश्मिरी (Kashmir) पत्रकार आणि विद्यार्थ्यांची भर्ती केली आहे. यामध्ये भाजप (BJP) कार्यकर्ते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे कार्यकर्ते हिटलिस्टवर होते'', असा राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA)ने दावा केला आहे. एएनआयने दहशतवादी कट प्रकरणात (Terror Conspiracy) २ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये हे धक्कादायक दावे करण्यात आले आहेत.
हेही वाचा: सुरक्षा दलाने संकरित दहशतवादी पकडला; होता पाक दहशतवाद्यांच्या संपर्कात
एएनआयने आपल्या आरोपपत्रात, ऑडिओ रेकॉर्डींग, लेख आणि चौकशीचा हवाला देत दावा केला आहे की, ''ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGWs) आयएसआय-समर्थित द रेझिस्टन्स फ्रंट (TRF)चे दहशतवादी बनले होते. त्यांना काश्मीरमधील सत्ताधारी पक्षातील भाजप कार्यकर्ते, मित्र पक्ष आणि नेत्यांवर हल्ले करण्याचे काम दिले होते. पाकिस्तानस्थित दहशतवादी कमांडरच्या निर्देशानुसार, दहशतवादी संघटनांच्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या संगनमताने आरोपी इश्फाक अमीन वाणी याने जेके अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी, भाजपच्या हिना बेग यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची बटमालूच्या कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये हत्या केली'', असंही आरोपपत्रात म्हटलं आहे. याबाब न्यूज १८ या वेबसाईटने वृत्त दिले आहे.
समन्वयासाठी गट स्थापन केला -
''आयएसआयने दहशतवाद्यांच्या कृत्याला वाढविण्यासाठी हिजबुल, लष्कर आणि अल बद्रच्या सर्व प्रमुख दहशतवादी कमांडर्सची बैठक बोलावली होती. युनायटेड जिहाद कौन्सिलच्या सय्यद सल्लुद्दीनच्या नेतृत्वाखाली बैठकीनंतर एक "समन्वय गट" तयार करण्यात आला. त्याद्वारे एकमेकांसोबत समन्वय साधून दहशतवादी संघटनांचे काम सुरू राहील, अशी योजना तयार करण्यात आली'', असा दावाही एनआयएने केला आहे. या समन्वय गटांना स्थानिक तरुणांची भर्ती करण्यास सांगण्यात आले होते'', असंही या आरोपपत्रात म्हटलं आहे.
मोदी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन -
आरोपीच्या मोबाईल फोनमधले स्क्रीनशॉट देखील आरोपपत्रात जोडण्यात आले आहे. यामध्ये ''काश्मीर बनेगा अफगाणिस्तान''चे नारे लावण्यात आलेल्या घटनांचे व्हिडिओ आणि फोटो आहेत. आरोपपत्राशी जोडलेल्या अनेक ऑडिओ आणि व्हिडिओ फायलींमध्ये दहशतवादी कमांडर मोदी सरकारला खोऱ्यातील परिस्थितीसाठी दोष देत आहेत. तसेच मोदी आणि त्यांच्या नेत्यांना धडा शिकविण्याचे आवाहन करत आहेत. आरोपपत्रात लष्कर-ए-तोयबाचा माजी अतिरेकी मुस्ताक अहमद जरगर, मुस्ताक लतराम आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा इमितियाज आलम, बशीर अहमद पीर हे या कटाचे सूत्रधार होते, असंही आरोपपत्रात म्हटलं आहे.
''पत्रकार आणि विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणून भर्ती केले'' -
''टेलिग्राम, सिग्नल, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे तपशीलवार संवाद देखील एनआयएने दिला आहे. छद्म नावाने एक गट कार्यत असून त्यांनी हिट अँड रन ही रणनिती वापरली आणि निवडक व्यक्तींवर लक्ष केंद्रीत केले होते. यामधअये अल्पसंख्याक, स्थानिक नसलेले नागरिक, पोलिस, सुरक्षा कर्मचारी आणि काश्मीरमध्ये स्थलांतरीत झालेल्या लोकांवर हल्ले करण्याचा कट होता. टीआरएफने पत्रकार आणि विद्यार्थ्यांना सक्रिय दहशतवादी म्हणून भर्ती केले आणि त्यांना हल्ले करण्यासाठी लहान शस्त्रे दिली. त्यांना पाकिस्तानमधून व्हिडिओद्वारे गन असेंबल करणे, रायफल आणि ग्रेनेड वापरणे यांसारखे प्रशिक्षण देत असल्याचं एएनआयने आरोपपत्रात जोडलेल्या व्हिडिओतून दिसत आहे. गेल्या २०२१ च्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात काश्मीरमध्ये पंडीत, शीख, मजूर आणि गैर-स्थानिक नागरिकांसह ४० जणांना ठार करण्यात आले'', असं एनआयएच्या अहवालात म्हटलं आहे.
Web Title: Nia Chargesheet Reveals Terrorist Organization Recruit Kashmir People Target Bjp Leaders
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..