काल्का (हरियाना) - पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर ती जम्मू- काश्मीरवर नसेल तर ती पाकव्याप्त काश्मीरवर असेल, खडे बोल सुनावले आहेत. ते हरियानामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आदळआपट करायला सुरवात केली आहे; पण आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील एकाही देशाने पाकच्या भूमिकेला समर्थन दिलेले नाही.
राजनाथ म्हणाले की, 'पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवर असेल. भारताशी चर्चेला सुरवात करण्यापूर्वी पाकिस्तानने आधी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. आमचा शेजारी आता आंतरराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावत असून, भारताने चूक केल्याचा सूर आळवतो आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे, आम्हाला का धमकावले जात आहे, जगातील सर्वांत शक्तिशाली देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनेही पाकिस्तानला धुडकावून लावत भारतासोबत चर्चा करा, असे सुनावले आहे. भारताला दहशतवादाच्या माध्यमातून अस्थिर आणि कमकुवत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून भारताला तोडू पाहत आहे; पण आमच्या 56 इंच छाती असलेल्या आमच्या पंतप्रधानांनी कसे निर्णय घ्यायचे, हे देशाला दाखवून दिले आहे.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या हवाई दलाने बालाकोट येथील दहशतवाद्यांची तळे नष्ट केली होती.''
इम्रान यांच्यावर निशाणा
राजनाथ यांनी या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही टीका केली. बालाकोटपेक्षाही मोठा हल्ला करण्याचे नियोजन भारताने आखल्याचा आरोप त्यांनी केला. या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या बालाकोट येथे भारताने हल्ला केल्याचे मान्य केले आहे, असे राजनाथ यांनी सांगितले.
|