'विरोधकांच्या वक्तव्यांमुळे पाकिस्तान खूश'

'विरोधकांच्या वक्तव्यांमुळे पाकिस्तान खूश'

पाटणा : आमचे लष्कर दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले करत असतानाच आपल्या देशातील काही मंडळी शत्रूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल अशी वक्तव्ये करत होती. याच मंडळींचे चेहरे पाकिस्तानी वृत्तवाहिन्या दाखवित होत्या. दहशतवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना चालविणाऱ्यांच्या विरोधात एका सुरात बोलणे गरजेचे असताना 21 पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात (एनडीए) निंदा प्रस्ताव मांडत होते. अशा स्थितीत पाकिस्तान आनंदित होईल की नाही? हे आमच्या विरोधकांना शोभते का? आता हीच मंडळी आमच्या जवानांच्या पराक्रमाचे पुरावे मागत आहेत. मी देश पुढे घेऊन जाऊ इच्छितो, पण विरोधक मात्र मलाच संपविण्याची गोष्ट करू लागले आहेत, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर आयोजित विजय संकल्प रॅलीमध्ये बोलताना केली. 

"कॉंग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष आमच्या वीर जवानांचे मनोबल तोडू पाहत आहेत का? देशाच्या शत्रूंना फायदा होईल अशी विधाने ते का करत आहेत, कॉंग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांचा देशाच्या सुरक्षिततेबाबतचा दृष्टिकोन योग्य नाही. आता आमचा देश नवी नीती आणि नवी रिती अंगिकारत मार्गक्रमण करतो आहे. आता भारत सर्वांचा चुन चुनकर हिशेब घेऊ लागला आहे. अवघा देश हे पाहतो आहे. मागील पन्नास वर्षांच्या कालखंडात देश शक्तिशाली का झाला नाही,'' असा सवालही त्यांनी केला.

सौदीच्या युवराजांच्या भारतभेटीचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, ""भारतातील मुस्लिम बांधव हे हज यात्रेला जाण्यास आतूर असतात. दरवर्षी ही संख्या वाढताना दिसते. पण आमचा कोटाच कमी असल्याने सर्वांनाच या यात्रेला पाठविणे शक्‍य नव्हते. आमचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर हा कोटा सौदीने दोन लाखांचा केला. ही भारताची खरी ताकद आहे. आताही सौदीतील तुरुंगात असलेल्या आठशे भारतीयांना सोडण्याची तयारी सौदी अरेबियाच्या सरकारने दर्शविली आहे.'' 

मोदी म्हणाले...

स्वार्थी राजकारण करणारे मोदींना शिव्या देतात. 
चौकीदार सावध असून, तो काम करतो आहे. 
अंधारयुगातून बिहारला बाहेर काढणारे नितीश अभिनंदनास पात्र. 
चौकीदारावर टीका करणाऱ्यांना लोक धडा शिकवतील. 
सर्व स्तरातील घटकांना लाभ देण्याचा केंद्राचा प्रयत्न. 
कॉंग्रेसचे म्हणणे इस्लामी देशांनी का ऐकले नाही? 
बिहारमधील पायाभूत सुविधांना एनडीएचा बूस्टर डोस. 

मान्यवरांची मांदियाळी

आजच्या या विजयी संकल्प मेळाव्यास बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान, त्यांचे पुत्र चिराग पासवान आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या सभेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाजप, लोकजनशक्ती पक्ष आणि संयुक्त जनता दलाचे कार्यकर्ते आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com