एका कुटुंबासाठी महापुरुषांचे योगदान नाकारले : नरेंद्र मोदी 

एका कुटुंबासाठी महापुरुषांचे योगदान नाकारले : नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली : लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज फडकावण्याची परंपरा असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सरकारच्या 75 व्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर आज ध्वजवंदन करून नवा पायंडा पाडताना राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी, "केवळ एका कुटुंबाचे महत्त्व वाढविण्यासाठी महापुरुषांचे योगदान नाकारण्यात आले,' अशा शब्दांत कॉंग्रेसला आडवळणाने लक्ष्य केले. 

आझाद हिंद सरकारच्या 75 व्या स्मृतीनिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावर रविवारी सोहळा झाला. या निमित्ताने लाल किल्ल्याच्या परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याप्रमाणेच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. सकाळी नऊच्या सुमारास पंतप्रधानांनी ध्वजवंदन केले. सांस्कृतिक मंत्री महेश शर्मादेखील या वेळी उपस्थित होते. आझाद हिंद सेनेतील वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकदेखील यात सोहळ्यात सहभागी झाले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.

ध्वजवंदनानंतर पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन केले. पारतंत्र्याच्या जोखडातून देशाची मुक्तता हे एकमेव स्वप्न नेताजींचे होते. भारत प्रगतिपथावर असून, आणखी नवी उंची गाठायची आहे, असे सांगताना मोदींनी कॉंग्रेसचे आणि गांधी कुटुंबीयांचे नाव न घेता हल्ला चढवला. मोदी म्हणाले, की एका कुटुंबाचे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी देशातील अनेक सुपुत्रांचे मग ते सरदार पटेल असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो त्यांच्याप्रमाणेच नेताजींचेही योगदान दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न झाला. 

नेताजींनी केंब्रिजमध्ये असताना केलेल्या लेखनाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींनी भारताकडे परदेशी चष्म्यातून पाहिले जाऊ नये, असे आवाहन केले. सुभाषबाबूंनी लिहिले होते की युरोप हे ग्रेट ब्रिटनचेच विस्तारित रूप असल्याचे भारतीयांना शिकवले जाते. त्यामुळे युरोपला इंग्लंडच्या चष्म्यातून बघण्याची आपल्याला सवय लागली आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला सुभाषबाबू, सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांचे मार्गदर्शन मिळाले असते आणि परदेशी चष्म्यातून भारताकडे पाहिले गेले नसते, तर परिस्थिती वेगळी असती, असेही मोदी म्हणाले. 

भारतीय सेनादलांचाही यानिमित्ताने पंतप्रधानांनी गौरव केला. भारतीय लष्कराची शक्ती स्वसंरक्षणासाठीच आहे. भारताला कधीही दुसऱ्याच्या जमिनीची लालसा नव्हती. परंतु, देशाच्या सार्वभौमत्वाला जो कुणी आव्हान देईल त्याला दुप्पट शक्तीने प्रत्युत्तर दिले जाईल, असाही इशारा पंतप्रधानांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com