नवी दिल्ली : गया जिल्ह्यातील 1992 रोजी झालेल्या सामूहिक हत्याकांड प्रकरणातील चार आरोपींना आज नववर्षानिमित्त राष्ट्रपतींकडून दिलासा मिळाला. राष्ट्रपतींनी चौघांची फाशीची शिक्षा रद्द करत शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले. विशेष म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाने या आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करू नये, अशी शिफारस केली होती.
कृष्णा मोची, नन्हेलाल मोची, वीर कुंवर पासवान आणि धर्मेंद्र सिंह ऊर्फ धारु सिंह अशी त्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी फाशीची शिक्षा माफ व्हावी, यासाठी 2004 मध्ये दयेचा अर्ज केला होता, तर केंद्रीय गृह मंत्रालयाने शिक्षा रद्द करू नये, अशी विनंती केली होती; परंतु राष्ट्रपतींनी दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास झालेला विलंब आणि मानवाधिकार आयोगाची मते लक्षात घेत आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
जून 2001 मध्ये नन्हेलाल मोची, कृष्णा मोची, वीर पासवान आणि धर्मेंद्र सिंह या चौघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. हे चौघेही माओवादी असून, त्यांनी 34 जणांची सामूहिक हत्या केली होती. बिहारच्या गृह विभागाकडून 2004 मध्ये दयेचा अर्ज पाठवण्यात आल्याचे म्हटले होते; परंतु तो अर्ज राष्ट्रपती भवनकडे पोचला नाही अन् गृह मंत्रालयाकडेही पोचला नसल्याचे उघडकीस आले होते.
|