पैगंबर निंदा वादाचे तीव्र जागतिक पडसाद; इराककडे भारताचा खुलासा

मालदीवच्या संसदेत भारतविरोधी प्रस्ताव
Nupur sharma and Naveen kumar jindal
Nupur sharma and Naveen kumar jindalsakal

नवी दिल्ली : भाजपचे माजी प्रवक्ते नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांनी प्रेषित पैगंबर यांच्याविरूध्द काढलेल्या अनुद्गार यामुळे आखाती व इस्लामी देशांतील तीव्र भारतविरोधी भावनेचा परीघ वाढत चालला असून १४ देशांनी भारताच्या विरोधात आवाज उठविला आहे. कतार व ओमान पाठोपाठ अनेक देशांत भारतीय उत्पादनांवर बहिष्काराची मागणी होत आहे. भारतीय विदेश मंत्रालयावर रोजच्या रोज खुलासे करण्याची नवी जबाबदारी येऊन पडल्याचे दिसत आहे. भारताने आज इराकच्या निषेधावर खुलासा करताना शर्मा यांचे वक्तव्य भारत सरकारचे मत नाही असे सांगीतले. मालदीवच्या संसदेत विरोधी पक्षांनी भारताची निंदा करणारा प्रस्ताव सादर करण्यात आला.

इराण, इराक, कुवेत, कतार, सऊदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमीराती, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लीबिया, इंडोनेशिया व पाकिस्तान या देशांनी भारताच्या सत्तारूढ पक्षाच्या प्रवक्त्यांनी काढलेल्या अनुद्गार याबद्दल निषेध नोंदविला आहे. कतार व ओमान यांच्या पाठोपाठ मालदीवमध्येही भारतीय वस्तूंवर बहिष्काराचे सावट आहे. मालदीवच्या संसदेत माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या नेतृत्वाखाली पीपीएम-पीएनसी व अन्य विरोधी पक्षांनी भारताच्या निषेधाचा व मालदीवचे भारताबरोबरचे संबंध संपुष्टात आणण्याची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला. मात्र तो ३३ विरूध्द १० अशा मतांनी फेटाळण्यात आला.

कतारने भारताकडून जाहीर माफीची मागणी कायम ठेवली आहे. ही धग संयुक्त राष्ट्रसंघा पर्यंत पोचली असून यूनोचे महासचिव एंटोनियो गुटेरेश यांच्यावतीनेही यावर निवेदन आले आहे. गुटेरेश यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले की भारतातील ईशनिंदेबाबतच्या बातम्या आम्ही वाचल्या आहेत. संबंधितांचे विधान आम्ही पाहिले वा एकले नाही. मात्र यूनो सर्व धर्मांच्या बद्दल सन्मान व सहिष्णुतेला ठामपणे प्रोत्साहन देतो.

नुपूर शर्मा प्रकरणी इराकने नोंदविलेल्या निषेधाला विदेश व्यवहार मंत्रालयाच्या वतीने इराकमधील भारतीय दूतावासाने आज एका निवेदनाद्वारे उत्तर दिले. इस्लामी सहयोग संघटनेला भारताने काल दिलेल्या उत्तराच्या तुलनेत इराकला भारताने दिलेल्या उत्तरातील भाषा सौम्य दिसत आहे. त्यात म्हटले आहे की ‘ संबंधित (द्वेषपूर्ण) ट्विट भारत सरकारचे मत नाही किंवा सरकारची ती विचारसरणीही नाही. भारत सरकार सर्व धर्मांचा सन्मान करते. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की अपमानास्पद टिप्पणी करणाऱयांवर यापूर्वीच कारवाई करण्यात आली आहे. द्विपक्षीय संबंध खराब करण्याचा हेतू असलेल्या खोडसाळ प्रवृत्तींविरूध्द आम्ही उभयतांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.

दरम्यान अरब देशांत लाखो भारतीय काम करतात. ओमान डेली आॅब्जर्वरमध्ये पत्रकारिता केलेले ज्येष्ठ पत्रकार धर्मानंद कामत यांच्या मते, आखाती देशांचे एक अधिकृत सूत्र कायम राहिलले आहे ते म्हणजे, ‘इस्लाम कोण्या अन्य धर्माचा अनादर करत नाही. त्याचवेळी आमची ही अपेक्षा आहे की प्रेषित महंमद पैगंबर व त्यांच्या वचनांबद्दल अन्य धर्मीयांंनी अनादर व्यक्त करू नये.‘ ते म्हणाले की हा भारत सरकार विरूध्द आखाती देश मुद्दा आहे. भारतीय राजदूतांना बोलावून निषेध नोंदविणे व राजनैतिक उपायांद्वारे भारताचे नाक दाबणे या मार्गांनीच खाडी देश जाण्याची शक्यता आहे. आखाती देशांत राहणाऱया भारतीयांना मुद्दाम त्रास दिला जाईल, बाहेर काढले जाईल अशी शक्यता तूर्तास दिसत नसल्याचेही कामत यांनी सांगितले. या देशांतील आखाती देशांचे अर्थकारण, विद्युत व आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता यासारख्या व्यवस्थांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो कारण अनेक यंत्रणातील लाखो कर्मचारी भारतीय आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com