Rahul Gandhi
Rahul Gandhi

...यासाठी चौकीदाराच्या तोंडातून एक शब्दही निघत नाही: राहुल गांधी

नवी दिल्ली : समाजातील सर्व घटकांची आता मोदी सरकारवर नाराजी आहे. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात देशाचे चौकीदार एक शब्दही बोलत नाहीत. आता जनता त्यांच्या भाषणात पारदर्शकता शोधत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

दिल्लीत आज (रविवार) काँग्रेसकडून जनआक्रोश रॅली घेण्यात आली. या रॅलीमध्ये अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी देशभरातून आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. या कार्यक्रमाला सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेते उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, ''सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इतिहासात प्रथमच जनतेकडे गेले. रॅफेल करार, अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीतील भ्रष्टाचार, ऊर्जामंत्री पियुष गोयल यांच्या कंपनीतील भ्रष्टाचार प्रकरणी मोदी एक शब्दही बोलत नाहीत. दुसरीकडे नीरव मोदी बँकांना लुटून परदेशात निघून जातो आणि आपले चौकीदार अजूनपर्यंत याविषयी काही बोलत नाहीत. देशातील जनतेचा पैसा लुटून नीरव मोदी परदेशात निघून गेला. मोदी फ्रान्समध्ये जाऊन रॅफेल कराराच्या किंमतींमध्ये बदल करतात आणि याची माहिती संरक्षण मंत्र्यांनाही नाही. उद्योगपतींचे अडीच लाख कोटींचे कर्ज मोदी सरकारने माफ केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचे एक रुपये कर्ज माफ केले नाही.''

डोकलामचा प्रश्न असताना पंतप्रधान चीनच्या अध्यक्षांसोबत एक शब्दही बोलत नाही. कोणताही अजेंडा न घेता ते चीनच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी गेले. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने असे केलेले नाही. काँगेसने 70 वर्षांत काही केले नाही, असे मोदी म्हणतात. मग, भाजपने 60 महिन्यात बेरोजगारी, भाजप नेत्यांकडून महिलांवर अत्याचार, गब्बरसिंग टॅक्स देशाला दिला. देश हा इमारतीसारखा असतो. पण, इमारत उभी करण्यासाठी पाण्याची गरज असते, काँग्रेस ही पाण्यासारखी आहे. काँग्रेस फक्त प्रेम पसरविण्याचे काम करते. भाजप आणि आरएसएससारखे द्वेष पसरविण्याचे काम करत नाही. 2014 मध्ये मोदींनी आमच्यासरकारविरोधात खोटे पसरविले. आता सर्व सत्य जनतेसमोर येत आहे. त्यामुळे आता कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच विजय होणार हे नक्की. 2019 मध्ये काँग्रेसचाच विजय निश्चित आहे. काँग्रेस कार्यकर्ते हे वाघाचे बछडे असून, ते सत्याच्या मार्गावरून कधीच हटणार नाही. या पक्षात युवक, ज्येष्ठांचा आदर केला जाईल. आपल्या पक्षात वेगवेगळे विचाराचे लोक असले तरी आपल्याला एक होऊन आरएसएसच्या विचारधारेविरोधात लढायचे आहे, असे कार्यकर्त्यांना बळ देताना राहुल गांधींनी म्हटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com