नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (बुधवार) संसदेत मांडलेला अर्थसंकल्प अगदीच फुसका असल्याची कडवट प्रतिक्रिया कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राहुल म्हणाले -
- या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनामधून सरकारची कोणतीही दृष्टी दिसून येत नाही. "मनरेगा' या योजनेबद्दलही सरकारचा मूलभूत गैरसमज दिसून आला. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीही घोषित करण्यात आलेली नाही.
- या अर्थसंकल्पामध्ये रोजगारनिर्मितीसाठी नव्या कल्पना मांडलेल्या नाहीत.
- राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधील भ्रष्टाचार रोखण्याकरिता करण्यात आलेल्या उपाययोजनेस आमचा पाठिंबा आहे
- या अर्थसंकल्पाचा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
- आम्हाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमामधून मोठ्या आतिषबाजीची अपेक्षा होती. मात्र हा अर्थसंकल्प अगदीच फुसका निघाला
गांधी यांच्याशिवाय या अर्थसंकल्पासंदर्भात कॉंग्रेस व इतर पक्षीय नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे -
या अर्थसंकल्पात शेतकरी आणि बेरोजगार युवकांसाठी काहीच नाही. अर्थसंकल्प म्हणजे लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न आहे.
- कमलनाथ, कॉंग्रेस नेते
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सुधारणांना परिपूर्ण असा हा अर्थसंकल्प आहे.
- मुख्तार अब्बाल नक्वी, भाजप नेते
राजकीय पक्षांना रोख निधी स्वीकारण्याची मर्यादा 20 हजारांवरून 2 हजारांवर आणण्यासंदर्भातील निर्णयाला अर्थच नाही. कारण, यामध्ये कोठेही देणगीदारांचा आकडा मर्यादित करण्यात आलेला नाही.
- योगेंद्र यादव, स्वराज पक्षाचे नेते
|