बंगळूर - गरिबांमधील गरिबांना परवडेल अशा दरात अन्न पुरविण्यासाठी "इंदिरा कॅंटिन'चे उद्घाटन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते बंगळूरमध्ये आज (बुधवार) करण्यात आले.
"अम्मा की इंदिरा कॅंटिन'
कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या "इंदिरा कॅंटिन' या उपक्रमाचे उदघाटन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केले. त्या वेळी बोलताना त्यांनी याचा "अम्मा कॅंटिन' असा उल्लेख केला. ते म्हणाले की, सर्वांनी "अम्मा कॅंटिन'चा वापर केला पाहिजे. मात्र लगेचच त्यांनी ही चूक सुधारून "इंदिरा कॅंटिन' असे म्हटले. त्यामुळे उपस्थितांमध्ये खसखस पिकली. या वेळी राहुल व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथील भोजनाचा आस्वाद घेतला. ""ही एक सुरवात आहे. कॉंग्रेस सरकारने याचा प्रारंभ केला ही आनंदाची गोष्ट आहे, असे सांगत 'काही दिवसांनी भाजपचे नेतेही येथे जेवताना तुम्हाला दिसतील,'' अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
"इंदिरा कॅंटिन' हा उपक्रम म्हणजे कर्नाटकला "भूकमुक्त' राज्य बनविण्याच्या दिशेने एक पाऊल अससल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या वेळी सांगितले. सिद्धरामय्या यांनी चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा एक रूपयात तांदूळ वाटपाचा प्रारंभ केला होता. बंगळूरमधील प्रत्येक वॉर्डमध्ये एक अशी 198 कॅंटिन सुरू करण्याचे उद्दिष्ट असून सध्या 101 कॅंटिन आहेत. येथे नाश्ता पाच रुपयांना तर जेवण दहा रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुरवातीला दररोज 500 नागरिक या सेवेचा लाभ घेतील. नंतर मागणीनुसार ही संख्या वाढेल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ""कर्नाटकममधील सर्व शहरांमध्ये "इंदिरा कॅंटिन' सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून अन्नापासून कोणीही वंचित राहू नये, हा त्यामागील उद्देश आहे. देशातील सर्व नागरिकांना झोपण्यापूर्वी पोटभर जेवण मिळावे, असे स्वप्न दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे होते.''
""नागरिकांच्या आरोग्याची घेणे महत्त्वाचे असल्याने येथील पदार्थ आरोग्यदायी असावे, तसेच त्याची गुणवत्ता कायम ठेवावी,'' असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. अन्न हा देशातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असल्यावर भर देत अशा प्रकारचे उपक्रम देशपातळीवर नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मजूर, रिक्षाचालक, ज्येष्ठ नागरिक व कामासाठी कर्नाटकमध्ये भेट देणारे नागरिक ज्यांना हॉटेलमध्ये जास्त पैसे देऊन खाणे शक्य नाही त्यांसाठी "इंदिरा कॅंटिन'ची सेवा उपयुक्त ठरणार आहे, असेही राहुल गांधी सांगितले.
|