डेथ ट्रेन : रेल्वेखाली चिरडून पंजाबात 61 जण ठार 

डेथ ट्रेन : रेल्वेखाली चिरडून पंजाबात 61 जण ठार 

अमृतसर (पंजाब) : रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोहमार्गावर गोळा झालेल्या लोकांना रेल्वेगाडीने चिरडल्याने किमान 61 जणांचा मृत्यू झाला, तर 72 जण जखमी झाले. 

जोडा फाटक येथे लोहमार्गाच्या शेजारील मोकळ्या जागेत रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सुमारे 300 जण या कार्यक्रमासाठी जमले होते. कार्यक्रम सुरू असतानाच अनेक जण लोहमार्गावर गेले, त्याच वेळी जालंधरहून अमृतसरला भरधाव जाणाऱ्या रेल्वेगाडीने त्यांना चिरडले. अमृतसर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी राजेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात किमान 61 जण मृत्युमुखी पडले असून, 72हून अधिक जणांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता. मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक मृतदेह ओळखूही येत नव्हते. "मी माझ्या चिमुकल्याला गमावले आहे. मला तो परत हवा आहे,' असा एका मातेने फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. या अपघातासाठी स्थानिक प्रशासन आणि दसरा समिती जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दसऱ्याच्या काळात रेल्वे फाटकाच्या जवळून जाताना रेल्वेगाड्यांचा वेग कमी करण्याची विनंती गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे; मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. 

कौर यांच्याविरुद्ध संताप 
रावणदहन कार्यक्रमाला नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी आमदार नवज्योतकौर सिद्धू या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कॉंग्रेसनेच हा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच, यासाठी परवानगीही घेण्यात आली नव्हती, अशी माहिती मिळाली आहे. अपघात झाल्या झाल्या नवज्योतकौर तेथून निघून गेल्या असा आरोप स्थानिकांनी केला, तो त्यांनी फेटाळला आहे. नियोजित वेळेनुसार तेथून मी बाहेर पडले व नंतर अपघात झाला, असे नवज्योत कौर यांनी म्हटले आहे. 

पाच लाखांची मदत 
अपघाताबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने तातडीने मदतपथके घटनास्थळी रवाना केली आहेत. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. रेल्वे राज्यमंत्री मनोजसिंह आणि रेल्वेचे अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत. पंजाब सरकारने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. पीयूष गोयल सध्या अमेरिकेत आहेत. त्यांनी पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, ते तातडीने भारतात परतणार आहेत. 

...असा झाला अपघात 
लोहमार्गाच्या शेजारीच रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी परवानगीही घेतलेली नव्हती. रावणदहन सुरू झाल्यानंतर फटाके फुटण्यास सुरवात झाली, त्यामुळे लोक मागे सरकू लागले, हळूहळू ते लोहमार्गावर गेले. तेथे अगोदरच अनेक जण होते. त्याच वेळी दोन्ही बाजूंकडून रेल्वेगाड्या आल्या. त्यातील एका गाडीपासून लोकांनी स्वतःचा बचाव केला, मात्र दुसऱ्या गाडीपासून ते स्वतःला वाचवू शकले नाहीत, अशी माहिती घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी दिली. फटाक्‍यांच्या आवाजामुळे लोकांना रेल्वेगाडीचा आवाज ऐकू आला नाही, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com