नवी दिल्ली - 'राजीव गांधी यांनी 1984 मध्ये प्रचंड बहुमताने सत्ता मिळवूनही या ताकदीचा वापर देशात भीतीचे वातावरण पसरविण्यासाठी किंवा लोकशाही संस्थांवर वरवंटा फिरविण्यासाठी केला नाही,' अशा शब्दांत कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आडवळणाने तोफ डागली. निमित्त होते राजीव गांधींच्या 75 व्या जयंतीचे.
कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या अटकनाट्याच्या सावटाखाली राजीव गांधींच्या 75 व्या जयंतीचा कार्यक्रम झाला. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअममध्ये झालेल्या या कार्यक्रमात बोलताना सोनिया गांधींनी राजीव गांधींच्या स्मृतीला उजाळा देताना आडवळणाने केंद्रावर टीका केली. राजीव गांधी 1984 मध्ये प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाले होते.
परंतु या शक्तीचा गैरवापर त्यांनी जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी कोणाला धमकावण्यासाठी, तसेच लोकशाहीच्या मूल्यांना नख लावण्यासाठी कधीही केला नाही. पंतप्रधान पदाच्या काळात राजीव गांधींनी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचून वैविध्याचा उत्सव साजरा करूनच आपण देशाचे ऐक्य टिकवून ठेवू शकतो, असा संदेश दिला.
कॉंग्रेसला 1989 मध्ये सर्वाधिक जागा मिळूनही राजीव गांधींनी सरकार बनविण्याचा दावा केला नाही. त्यांच्या नैतिक शक्तीने आणि आंतरिक औदार्य, इमानदारीने त्यांना असे करू दिले नाही. जे राजीव गांधींनी केले तेच राहुल गांधींनीही केले, अशा शब्दांत सोनियांनी राहुल गांधींच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनाम्यावर ठाम राहण्याच्या निर्णयाचे सूचकपणे समर्थन केले.
|