कायदा करून सरकारने राम मंदिराबाबतचा प्रश्‍न मिटवावा

ayodhya
ayodhya

नवी दिल्ली: राम मंदिराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाने हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतप्त भावना असून, मोदी सरकारने आगामी हिवाळी अधिवेशनातच कायदा करून हा प्रश्‍न मिटवावा, अशी मागणी विश्‍व हिंदू परिषदेने केली आहे. मंदिरासाठी न्यायालयाच्या निकालांची अनंत काळापर्यंत वाट पहाण्यात अर्थ नसल्याचेही या संघटनेने म्हटले आहे. विहिंप या मुद्द्यावर साऱ्या खासदारांच्या भेटी घेणार आहे.

दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर त्वरित व्हावे व याबाबत संतांचा निर्णय अंतिम असेल अशी सावध भूमिका घेतली आहे. संत-महंतांच्या धर्मसंसदेची बैठक हिवाळी अधिवेशनानंतरच्या अलाहाबाद कुंभमेळ्या
वेळी म्हणजे 31 जानेवारीला होणार आहे. संघाचे प्रचारप्रमुख अरुणकुमार यांनी पत्रकात म्हटले आहे, की उच्च न्यायालयाचा हाच निर्णय आहे की, वादग्रस्त जागेवरच रामाचा जन्म झाला व सारे पुरावेही त्याची साक्ष देणारेच आहेत. त्यामुळे राम जन्मभूमीवर "शीघ्रातीशीघ्र' भव्य मंदिर झाले पाहिजे. तसे झाले तरच देशात सद्भावना व एकात्मतेचे वातावरण निर्माण होईल. न्यायालयाने यात त्वरित निकाल द्यावा आणि काही अडचण असेल तर सरकारने कायदा बनवून मंदिर निर्माणातील सर्व अडथळे दूर करून ही जागा श्रीराम जन्मभूमी न्यासाकडे सोपवावी. हे आंदोलन पहिल्यापासून संत व धर्मसंसदेच्या नेतृत्वाखाली सुरू आहे व यापुढे ते जो निर्णय करतील त्याला संघ पाठिंबा देईल.

विहिंपचे कार्याध्यक्ष आलोककुमार यांनी ताज्या निकालाचे वर्णन "प्रलंबित न्याय हे न्याय नाकारणेच आहे,' या अर्थाचे इंग्रजी वाक्‍य उधृत करून सांगितले, की राम मंदिर मुद्द्याचा तोडगा हा न्यायालयीन मार्गाने निघणार नाही हा विहिंपचा संशय होता व आजच्या निकालाने त्याला बळकटी मिळाली आहे. 2018 चा सूर्यास्त होण्याआधी राम मंदिराची निर्मिती सुरू होणार, ही आमची भूमिका ठाम आहे.

याबाबत सर्वप्रथम न्यायालयात धाव घेणारे हाशीम अन्सारी यांचे पुत्र मुस्लिम पक्षकार इकबाल अन्सारी यांनी हा 70 वर्षे जुना विवाद असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की न्यायालयीन सुनावणी लांबत गेल्यास राजकीय नेत्यांसाठी "चांदणी रात्र' ठरते. हा विवाद संपला पाहिजे व आम्ही सारे पुरावे न्यायालयास दिले आहेत. राम मंदिरासाठी कोणताही कायदा आणण्याची गरज नाही. न्यायालय निर्णय करेल. शिया वक्‍फ बोर्डाचे वासीम रिझवी म्हणाले, की काही कट्टरपंथी मौलवी व काँग्रेसच्या राजकारणामुळे हे प्रकरण न्यायालयात लटकले आहे. देवाला आपल्या घरासाठी माणसांच्या न्यायालयाच्या निकालाची वाट पहावी लागणे लाजिरवाणे आहे.

जानव्याची जाहिरात!
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी जानवेधारी असल्याची जाहिरात तो पक्ष करतो. त्या पक्षाच्या यापूर्वीच्या अध्यक्षांनी जानव्याची अशी जाहिरात केलेली नव्हती. राहुल गांधी पूजाअर्चा करतात व ते शिवभक्त असल्याचाही प्रचार केला जातो. त्यामुळे सध्याची काँग्रेस ही वेगळीच असून राम जन्मभूमीवर त्या पक्षाच्या नेतृत्वानेच स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, असेही आलोककुमार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com