नवी दिल्ली - आरक्षणाचे लाभ मिळणाऱ्या लोकांना जोपर्यंत त्याची गरज आहे तोवर आरक्षणाची तरतूद कायम राहिली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व्यक्त करण्यात आले. समाजात आर्थिक व सामाजिक असमानता अजूनही कायम आहे व यामुळेच आजही आरक्षण आवश्यक आहे, असे संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आज सांगितले.
सरसंघचालकांनी 2015 व अलीकडे आरक्षणावर भाष्य करताच विरोधकांनी कडाडून हल्ला चढवून दलित व शोषितांसाठीचे आरक्षण संपविण्याचेच संघाचे कारस्थान आहे, असे टीकास्त्र सोडले होते. याच मुद्द्यावरून राज्यसभा अनेक दिवस ठप्प पडल्याचेही प्रकार झाले आहेत. आरक्षणासारख्या मुद्द्यावर संघाने भाष्य केले, की ते वादग्रस्त ठरते, हा पूर्वानुभव असूनही संघ आरक्षणाचा राग वारंवार का आळवितो, याचे जाणकारांना कोडे पडले आहे.
राजस्थानातील पुष्कर येथे भाजपसह विविध संघपरिवार संघटनांच्या वार्षिक समन्वय बैठकीत परिवारातील 35 संघटनांचे 200 प्रतिनिधी हजर होते. या बैठकीनंतर बोलताना होसबळे म्हणाले की, राज्यघटनेने दिलेल्या (10 टक्के मूळ टक्केवारीच्या) आरक्षणाचे संघ संपूर्ण समर्थन करतो. समाजात सामाजिक-आर्थिक असमानता आहे तोवर आरक्षण चालू राहणे आवश्यक आहे. आरक्षणाचा फेरआढावा घेणे हा निर्णय धोरण आखणी करणाऱ्या व या मुद्द्याशी संबंधित लोकांनी घ्यायचा आहे. हे काम त्यांचे आहे. आरक्षणाच्या लाभार्थींना वाटते तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे, असे संघाचे मत आहे.
या तीन दिवसांच्या बैठकीत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी पक्षाच्या कामकाजाचा व जम्मू-काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द करण्याच्या कायद्याबाबतचा अहवाल संघनेतृत्वासमोर सादर केला. आसामात वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरबाबत (एनआरसी) संघप्रतिनिधींच्या शंकांना राम माधव यांनी उत्तरे दिली.
|