नवी दिल्ली : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथूराम गोडसे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यानंतर लोकसभेत गदारोळ उठला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी माफी मागितल्यानंतरही विरोधकांचे समाधान न झाल्याने साध्वी प्रज्ञा यांनी दुसऱ्यांदा माफी मागितली. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटवरून मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा?
महात्मा गांधींच्या हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेला देशभक्त म्हटल्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा वादात सापडल्या आहेत. लोकसभेत सकाळी माफी मागितल्यानंतरही विरोधकांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा सभागृहात माफी मागितली. पहिल्यांदा माफी मागताना त्यांनी केवळ 'माझ्या वक्तव्यामुळे जर, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, मी माफी मागतो.', अशी माफी मागितली होती. पण, दुसऱ्यांदा माफी मागताना साध्वी प्रज्ञा यांनी, 'आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला. ते विधान मोडून तोडून दाखवण्यात आले. मी महात्मा गांधी यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा मी सन्मान करते. पण, माझ्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नसताना मला सार्वजनिकरित्या दहशतवादी असे संबोधले आहे. हा एका महिलेचा अपमान आहे,' असे म्हटले आहे.
राहुल गांधींविरोधात नोटिस
साध्वी प्रज्ञासिंह यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवर नाराजी व्यक्त केली. ही नाराजी व्यक्त करताना, साध्वी प्रज्ञा यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात विशेष अधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी संसदेबाहेर मीडियाशी बोलताना आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलंय.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.