उन्नाव (उत्तर प्रदेश) - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2019 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक माझ्याविरोधात लढवावी, असे आव्हान भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी दिले असून, यात माझा पराभव झाला तर मी राजकारण सोडेन, असेही ते म्हणाले.
साक्षी महाराज उन्नावचे प्रतिनिधित्व करतात. ते रविवारी (ता. 7) पत्रकारांशी बोलत होते. "पुढील लोकसभा निवडणूक उन्नावमधून माझ्याविरोधात लढविण्याचे आव्हान मी राहुल गांधी यांना देत आहे. यात ते जिंकले तर मी राजकारण सोडेन; पण ते हरल्यास त्यांनी भारत सोडून इटलीला जावे,'' असे आव्हान त्यांनी दिले. राहुल यांच्या मानसरोवर यात्रेवरही त्यांनी टीका केली. या यात्रेत त्यांनी पावित्र्य जपले नाही, असे ते म्हणाले. "आमचा या यात्रेला विरोध नाही. भाजप असे का करेल? मात्र अशा तीर्थयात्रांसाठी पावित्र्य जपणे आवश्यक असल्याचे शास्त्रात म्हटले आहे. यात्रा करण्यापूर्वी त्यांनी शुद्ध व्हायला हवे होते. मांसाहार केल्यानंतर दर्शन घेण्याची कृती समर्थनीय नाही,'' असे मत साक्षी महाराजांनी व्यक्त केले. "ते कधीकधी टोपी घालतात आणि स्वतःला शिवभक्त म्हणवून घेतात,' असा शेराही त्यांनी मारला.
'युद्धा'त निर्णय परिस्थितीनुसार |
आगामी लोकसभा निवडणुकीत राम मंदिर हा मुद्दा असणार का, या प्रश्नावर बोलताना साक्षी महाराज म्हणाले, की आतापर्यंत 'सब का साथ सब का विकास' हे प्रमुख सूत्र आहे. पण 'युद्धा'त परिस्थितीवर काही निर्णय घ्यावे लागतात. विरोधी पक्षांना भाजपकडून पराभव होण्याची भीती असल्यानेच ते महायुतीबद्दल बोलत आहेत, असेही ते म्हणाले. |
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.