भ्रष्टाचार रोखावा; का भारत बंद करावा: मोदी

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली - "काळे धन व भ्रष्टाचाराचा मार्ग रोखावयाचा आहे; की भारत बंद करावयाचा आहे,' अशी संतप्त विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) उत्तर प्रदेशमधील एका सभेमध्ये बोलताना केली. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) "परिवर्तन यात्रे'मध्ये पंतप्रधान बोलत होते.

500 व 1000 रुपये किंमतीच्या नोटा चलनामधून बाद करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांस फटका बसत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी येत्या 28 नोव्हेंबर रोजी देशव्यापी बंदाची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधानांनी ही विचारणा केली आहे.

"आम्ही भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न करत आहोत; आणि ते भारत बंदाचे आयोजन करत आहेत. भ्रष्टाचाराचा मार्ग रोखावयास हवा; की भारत बंद ठेवावयास हवा? भ्रष्टाचार व काळ्या धनाने भारताचे प्रचंड नुकसान केले आहे. मात्र आता भारत अशा सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे. आणि अडचणींचा सामना करावा लागत असूनदेखील सरकारच्या या निर्णयास मान्यता दर्शविणाऱ्या जनतेस माझे वंदन आहे,'' असे पंतप्रधान म्हणाले.

मोदी यांनी यावेळी देशातील जनतेने आता रोख रकमेपेक्षा इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमधून आर्थिक व्यवहारांवर भर द्यावा, असे आवाहन केले. तंत्रज्ञानाचा वापर करुन आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक करण्याच्या या प्रक्रियेमध्ये देशातील तरुणाईने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com