‘सर्वोच्च युद्धभूमी’ पर्यटकांसाठी खुली

‘सर्वोच्च युद्धभूमी’ पर्यटकांसाठी खुली

लेह-लडाख : ‘जगातील सर्वोच्च युद्धभूमी’ अशी ओळख असलेला सियाचीनचा काही परिसर पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज जाहीर केले. सियाचीन बेस कॅम्पपासून कुमार पोस्टपर्यंतचा परिसर पर्यटकांसाठी खुला असेल, असे त्यांनी सांगितले.
लडाखमधील पर्यटनाला उत्तेजन देणे आणि आपले जवान आणि अभियंते किती प्रतिकूल परिस्थितीत काम करतात याची थोडीतरी कल्पना नागरिकांना यावी हा त्यामागचा उद्देश असल्याचे राजनाथसिंह यांनी नमूद केले. पूर्व लडाखमधील श्‍योक नदीवरील छेवांग रिनछेन पुलाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी सियाचीनचा काही परिसर पर्यटकांसाठी खुला करण्यात येत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘लडाखचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी हा परिसर पर्यटनासाठी खुला करण्याची अपेक्षा त्यांच्या भाषणात व्यक्त केली होती. त्यानुसार, सियाचीन बेस कॅम्प ते कुमार पोस्टपर्यंतचा भाग पर्यटकांसाठी खुला करण्याचा निर्णय सरकारने केला आहे हे जाहीर करताना मला आनंद वाटत आहे. आपले जवान आणि अभियंते किती खडतर स्थितीत काम करतात हे नागरिकांना त्यामुळे समजेल.’’

सियाचीनमध्ये लष्कराचे जवान आणि अभियंते किती प्रतिकूल स्थितीत काम करतात याची थोडीतरी कल्पना नागरिकांना यावी यासाठी हा परिसर काही प्रमाणात पर्यटकांसाठी खुला करावा, असा प्रस्ताव लष्कराने सरकारकडे सादर केला होता, त्याला सरकारने आज मान्यता दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

सियाचीन परिसरात पर्यटनाला परवानगी दिल्यामुळे पर्यावरणाचा प्रश्‍न गंभीर होईल, असे मत लष्कराच्या उत्तर विभागाचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल बी. एस. जसवाल यांनी व्यक्त केले. पर्यटनामुळे वाढणाऱ्या कचऱ्याचा परिणाम हिमनदीवर होईल. लष्कराचे येथे अस्तित्व असल्यामुळे विघटीत न होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्‍न सध्या आहेच; त्यात भर पडेल, असे ते म्हणाले.

हिमदंश आणि उणे ६० अंश!
काराकोरम पर्वतश्रेणीतील सुमारे वीस हजार फूट उंचीवरील सियाचीन ही जगातील सर्वांत उंचावरील युद्धभूमी असून, जोरदार वारे आणि हिमदंशाचा सामना आपल्या जवानांना करावा लागतो. बर्फाचे कडे कोसळणे ही या हिमनदीवरील हिवाळ्यातील नेहमीची घटना आहे. हिवाळ्यात येथील तापमान उणे ६० अंशांपर्यंत जाऊ शकते. गेल्या दहा वर्षांत लष्कराने त्यांचे १६३ जवान येथे गमावले आहेत. १९८४ पासून भारत आणि पाकिस्तानचे सैन्य येथे तैनात आहे. १९८४ मध्ये लष्कराने केलेल्या ‘मेघदूत’ मोहिमेपासून ही हिमनदी भारताच्या ताब्यात आली आहे.

या निर्णयामुळे स्थानिकांना फायदा होणार असला, तरी सुरक्षेचा विचार करून पर्यटकांसाठी; विशेषतः परकीय नागरिकांसाठी लक्ष्मणरेषा आखावी.
- लेफ्टनंट जनरल बी. एस. जसवाल, लष्कराच्या उत्तर विभागाचे माजी प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com