नवी दिल्ली- राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधीलच काही पक्षांची नरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा नाही, असे राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशावह यांनी म्हटले आहे. या अंतर्गत गोष्टी असल्याने याचे स्पष्टीकरण देणे योग्य नाही, वेळ आल्यावर सर्व गोष्टीचा आपण खुलासा करणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
त्याचबरोबर, त्यांनी जागा वाटपासंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले आहे. तसेच, यासंदर्भात कुठल्याही प्ररकारची बैठक झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपामधील काही नेत्यांनी आणि रामविलास पासवान यांनी निवडणुकांसंदर्भात काही वक्तव्ये केली असली तरी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधीलच काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पेरत असल्याचेही कुशावह यांनी म्हटले आहे. या लोकांची नरेंद्र मोदी यांना 2019 च्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नापसंती आहे.
दरम्यान, बिहारमध्ये भाजपा इतकीच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडची ताकत आहे. पण सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार जेडीयूला फक्त 12 जागा देण्याचा प्रस्ताव आहे. राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला 06 आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपीला 02 जागा देण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती आहे. परंतु, जेडीयूचे नेते के सी त्यागी यांनी जागा वाटपासंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगितले होते. चर्चा सुरु असताना हे आकडे येतात कुठून ? असा सवाल त्यांनीही केला आहे. 12 जागा आम्हाला कधीही मान्य होणार नाहीत असे त्यांनी सांगितले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.