...अन् सोनिया गांधींनी केले भाजपच्या 'या' मंत्र्याचे कौतुक

...अन् सोनिया गांधींनी केले भाजपच्या 'या' मंत्र्याचे कौतुक

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केलेले असताना आज लोकसभेत देशातील रस्ते कामातील प्रगतीवरून नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक झाले. गडकरी यांनी चार वर्षांत देशात झालेल्या रस्ते, महामार्ग आणि पायाभूत सुविधा उभारणीच्या कामाची माहिती दिली तेव्हा कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी बाके वाजवून त्यांना पाठिंबा दिला. यात यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही समावेश होता. 

लोकसभेत आज भारतमाला योजनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, की आपल्या क्षेत्रात चांगले काम झाल्याचे सर्वच पक्षाच्या खासदारांनी मान्य केल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. गडकरींकडे सध्या जलस्रोत आणि गंगा संरक्षण मंत्रालयाचादेखील कार्यभार आहे. या अनुषंगाने चारही धामांना जोडणाऱ्या प्रकल्पासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना गडकरींनी गंगा नदीच्या कामाचा उल्लेख केला.

ते म्हणाले, प्रयागराज येथे यंदा प्रथमच गंगा नदी स्वच्छ आणि निर्मळ दिसत आहे. अध्यक्ष महोदय आपण एकदा गंगा नदी पाहा. गंगा नदीचे किती काम झाले आहे, हे आपल्या लक्षात येईल. यावर अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या, की गंगा नदीचे काम झाले आहे आणि आमचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. या वेळी भाजपचे गणेश सिंह यांनी गडकरींनी केलेल्या कामाची पावती म्हणून लोकसभेत धन्यवाद प्रस्ताव मंजूर व्हायला हवा, अशी मागणी केली. यावर भाजप खासदारांनी बाके वाजवून स्वागत केले.

तसेच यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस नेते मल्लिाकुर्जन खर्गे यांच्यासह अन्य काही विरोधी पक्षांच्या खासदारांनीदेखील बाके वाजवून गडकरींच्या कामांचे समर्थन केले. 

चारधाम योजना 2020 पर्यंत पूर्ण होईल

बाराही महिने उत्तराखंडच्या चार धाम यात्रा घडवणारी चारधाम योजना 2020 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वर्तविली. गडकरी म्हणाले की, या चारधाम योजनेतंर्गत तयार होणारा 889 किलोमीटरचा मार्ग हा नैसर्गिक आपत्तीतही टिकून राहणारा आहे. मुसळधार पाऊस, पूर आदी नैसर्गिक संकटातही या रस्त्याची हानी होणार नाही. चारधाम करणाऱ्या भाविकांच्या प्रवासावर कोणताही परिणाम होणार नाही.

संपूर्ण वर्षभर बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे रस्ते मार्गाने जाता येणार आहे. चारधाम योजना साकारताना पर्यावरण आणि संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार केला गेला असल्याचे गडकरी म्हणाले. याशिवाय संपूर्ण देशात 83 हजार किलोमीटरपेक्षा अधिक रस्त्यांना जोडणारा सागरमाला प्रकल्प 2022 च्या अगोदर पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. हा प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर देशातील रस्तेमार्गाचा चेहरामोहरा बदलेल, असे गडकरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com