12 दिवसात बदला घेतला: संरक्षण राज्यमंत्री

Subhash Bhamre
Subhash Bhamre

धुळे : काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या शहीद जवानांच्या रक्ताचा, प्रत्येक थेंबाचा आम्ही बदला घेऊ. नंतर बारा दिवसात देशाने पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या दहशतवादी अड्ड्यांवर "एअर स्ट्राईक' करून आज पहाटे बदला घेतला. या यशस्वी कारवाईमुळे भारतीय वायू सेनेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

दिल्लीत तळ ठोकून असलेले मंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले, की पाक व्याप्त काश्‍मीरमध्ये घुसखोरी करत भारतीय वायू सेनेच्या मिराज- 2000 या लढाऊ विमानांनी आज पहाटे दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उध्वस्त केले. त्यात 250 ते 300 दहशतवाद्यांना ठार करीत पुलवामामध्ये हल्ल्याचा बदला देशाने घेतला. आपले जवान शहीद झाल्यानंतर भारतीयांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही सर्वच दुःखी झालो. आमच्याही मनात पाकिस्तानसह दहशतवाद्यांविषयी प्रचंड संताप निर्माण झाला. आमच्या शहीद 40 जवानांचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, असा संकल्प केला. भारतीय सैन्य दलाला पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्रालयाने खुली सूट दिली. नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकाकी पाडण्याचे काम केंद्र सरकारने केले. 

तीन ठिकाणी बॉम्बफेक
पाकिस्तान जगात एकाकी पडला. सर्व बाजूने पाकिस्तानची कोंडी केल्यावर आज 12 व्या दिवशी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी भारतीय वायू सेनेचे मिराज- 2000 ही लढाऊ विमाने पाकव्याप्त काश्‍मीरमधील जंगलात घुसली. त्यांनी बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी, अशा तीन ठिकाणी तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब फेकत जैश- ए- महम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनांची प्रमुख ठिकाणे उध्वस्त केली. त्यात दोनशे ते तीनशे दहशतवाद्यांचा खातमा केला. याव्दारे कारवाईव्दारे देशातील शहीद जवानांच्या बलिदानानंतर बदला घेण्यात आला. भारतीय वायू दलाचा मला व देशाला सार्थ अभिमान आहे. पाकिस्तानला मोठी अद्दल वीर जवानांनी घडवली आहे. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढण्यात आले, असे मंत्री डॉ. भामरे म्हणाले. 

भामरेंचा घडामोडीत सहभाग 
देशाने केलेल्या या मोठ्या कारवाईमधील घडामोडींत मंत्री डॉ. भामरे यांचा सक्रिय सहभाग होता. त्यासाठी रविवारी रात्रीच त्यांना दिल्लीत बोलाविण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी दिवसभर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि तीनही सैन्य दलप्रमुखांसोबत बैठक झाली. यात ठरलेल्या नितीनुसार आणि देखरेखीत "एअर स्ट्राईक'व्दारे जैश- ए- महम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनांचे अड्डे, जैश ए मोहम्मदची "अल्फा 3 कंट्रोल रूम' पूर्णपणे उद्‌ध्वस्त करण्यात आली. पाकिस्तानी लष्कराने हद्दीत भारतीय विमानांनी घुसखोरी केल्याचे मान्य केले आहे, असेही मंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com