पाटणा - बिहारमध्ये आज घोंघावणारे वादळ व पावसामुळे पंधरा जणांचा मृत्यू झाला. आज झालेल्या या वादळ व पावसामुळे राज्यातील 11 जिल्ह्यांत उभ्या पिकांचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ताशी 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळाने राज्याच्या अनेक भागांत दाणादाण उडाली. राज्यात 8.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. उद्या सकाळीही आणखी वादळ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव प्रत्यय अप्रित यांनी राज्यातील हानीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ""लखीसराई, औरंगाबाद, मधुबनी, बेगुसराई जिल्ह्यांत प्रत्येकी दोन, तर पाटणा, नालंदा, पुरलिया, सुपाल, मुंगेर, अरारिया या जिल्ह्यांत प्रत्येकी एका व्यक्तीचा या वादळी पावसात बळी गेला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या वारसांना चार लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर केले आहे. तसेच वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.''
|