जवानाच्या विटंबनाचे तीव्र पडसाद

जवानाच्या विटंबनाचे तीव्र पडसाद

कुरुक्षेत्र/जम्मू - कुपवाडा सेक्‍टरमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्यात हुतात्मा झालेल्या जवानाच्या पार्थिवाची विटंबना केल्याने या जवानाच्या गावातील लोक संतप्त झाले असून, त्यांनी याला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. हरियानातील या जवानाचे गाव दुःखात बुडाले असून, या घटनेचा बदला घेण्याची मागणी होत आहे.

नियंत्रणरेषेजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पंजाब रेजिमेंटमधील मनदीपसिंह हा जवान हुतात्मा झाला होता. दहशतवाद्यांनी पळून जाताना त्याच्या पार्थिवाची विटंबना केली होती. हे कृत्य निंदनीय असल्याचे मत आज केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. ही घटना नैतिकतेला धरून नसल्याचे मत कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केले आहे. दरम्यान, या जवानाच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानला धडा शिकविण्याची इच्छा व्यक्त केली असून, माजी लष्कर अधिकाऱ्यांनीही खेद व्यक्त केला आहे. या जवानाचा भाऊ संदीपसिंह याने एका जवानाच्या बदल्यात पाकिस्तानची 10 मुंडकी आणण्याचे आवाहन केले आहे.

मनदीपची पत्नी प्रेरणा हिच्या सांत्वनासाठी आज अनेक महिलांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. मनदीप आणि प्रेरणाचा दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. सध्या ती हरियाना पोलिसमध्ये हेडकॉन्स्टेबल आहे. मनदीपच्या वडिलांनी मात्र पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ : राजनाथसिंह
नवी दिल्ली - गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आपली सुरक्षा दले पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देतील, असे आश्‍वासन दिले आहे. पाकिस्तानकडून वारंवार होत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि काल झालेली जवानाच्या पार्थिवाच्या विटंबनेची घटना या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे विधान केले. भारत कोणासमोरही झुकणार नाही, आपण याला योग्य प्रत्युत्तर देऊ, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज सुरक्षा दले सीमारेषेवर तैनात असल्यामुळेच देशातील लोक आनंदाने दिवाळी साजरी करत आहेत. लोकांनी सुरक्षा दलांवर विश्‍वास ठेवावा, ते नक्कीच शत्रूंचा नायनाट करतील, असे त्यांनी या वेळी सांगितले.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीला मूठमाती
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने लक्ष्यवेधी हल्ले केल्यानंतर पाकिस्तानकडून तब्बल 40 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची माहिती समोर आली आहे. सीमारेषा आणि प्रत्यक्ष ताबारेषेवर शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करून पाकिस्तानने शस्त्रसंधीला मूठमातीच दिल्याचे बोलले जात आहे. 25 नोव्हेंबर 2013 ला हा शस्त्रसंधी करार करण्यात आला होता; परंतु गेल्या 13 वर्षांतही अनेकदा पाकिस्तानकडून या कराराचे उल्लंघन करण्यात आले असून, आत्तापर्यंत सुमारे 1,741 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com