पाकच्या निमंत्रणाला स्वराज यांचा नकार

 पाकच्या निमंत्रणाला स्वराज यांचा नकार

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या पायाभरणी कार्यक्रमाला येथील सरकारने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. स्वराज यांनी उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविले आहे.

पाकिस्तानच्या सीमेनजीकच्या भारतातील गुरुदासपूर आणि पाकिस्तानमधील गुरुदासपूरमधील ऐतिहासिक गुरुद्वारा यांना जोडणारा धार्मिक कॉरिडॉर बांधला जावा, ही शीख समुदायाची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. दोन्ही देशांनी आपापल्या भागात या कॉरिडॉरसाठीचे बांधकाम करण्यास मान्यता आधीच दिली आहे. या कॉरिडॉरच्या पायाभरणीचा कार्यक्रम 28 नोव्हेंबरला होत असून, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महंमद कुरेशी यांनी सुषमा स्वराज, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रण पाठविले आहे. स्वराज यांनी कुरेशी यांचे निमंत्रणाबद्दल आभार मानत कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचे कळविले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर बादल अणि हरदीपसिंग पुरी हे माझ्याऐवजी भारताचे प्रतिनिधीत्व करतील, असे स्वराज यांनी कुरेशी यांना सांगितले. गुरुद्वारा कर्तारपूरसाहिब येथे आमचे नागरिक लवकरात लवकर प्रार्थना करू शकतील, यासाठी पाकिस्तान सरकार कॉरिडॉरचे काम वेगाने पूर्ण करेल, अशी आशाही स्वराज यांनी व्यक्त केली.

भारताकडून डेरा बाबा नानक येथे उद्याच (ता. 26) या कॉरिडॉरचे भूमिपूजन होणार आहे. हा कॉरिडॉर बांधण्यास पुढाकार घेतल्याबद्दल अमेरिकेतील शीख नागरिकांनीही भारत सरकारचे अभिनंदन करत आभार मानले आहेत. गुरुदासपूरमधील डेरा बाबा नानक या ठिकाणापासून कर्तारपूरसाहिब पाकिस्तानमध्ये चार किलोमीटर अंतरावर रावी नदीच्या काठावर आहे. याच ठिकाणी गुरुनानक देव यांचे निधन झाल्याचे मानले जाते. 

अमरिंदर यांचा नकार; सिद्धू जाणार 
पंजाब आणि भारतीय सीमेवरील पाकिस्तानमधील दहशतवाद्यांकडून हिंसाचार होत असल्याचे सांगत या घटनांचा निषेध पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी पाकिस्तानचे निमंत्रण नाकारले आहे. "नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान हुतात्मा अथवा जखमी झाला नाही, असा एकही दिवस जात नाही. शिवाय, आयएसआयकडूनही आता पंजाबमध्ये कारवाया सुरू आहेत. त्यामुळे तुमच्या निमंत्रणाचा स्वीकार करू शकत नाही,' असे अमरिंदर यांनी कुरेशी यांना कळविले आहे. मात्र, "या निमंत्रणामुळे हृदयाची आणि मनाची बंधने मुक्त होतील,' असे सांगत सिद्धू यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. 

26/11चा हल्ला आणि पाकिस्तानचे निमंत्रण यांच्याकडे दोन वेगळ्या घटना म्हणून पाहायला हवे. अर्थात, पाकिस्तानशी चर्चेबाबतच्या भारताच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. - व्ही. के. सिंह, परराष्ट्र राज्यमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com