चेन्नई - तमिळनाडू राज्य परिवहवन महामंडळाच्या (टीएनसीटीसी) कर्मचारांचा संप आठव्या दिवशी (गुरुवारी) मागे घेण्यात आला. त्यामुळे एसटी वाहतूक आज (शुक्रवार) सकाळपासून पूर्ववत सुरू झाली असून पोंगल सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पगारवाढीबाबत सरकारशी झालेली बैठक निष्फळ ठरल्याने येथील बस कर्मचाऱ्यांनी 4 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला होता.17 कामगार संघटना या संपात उतरल्या होत्या. यात विरोधी द्रमुक आणि डाव्या पक्षांशी संबंधित संघटनांचाही समावेश होता. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पगारवाढ करण्यास नकार दिला होता.
हा प्रश्न सोडविण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने मध्यस्थाची नेमणूक करण्याचा आदेश दिल्यानंतर "सिटू' संघटनेचे नेते ए. सुंदरराजन यांनी संप तात्पुरता मागे घेण्याची घोषणा केली. पोंगलनिमित्त राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून हा संप तात्पुरता मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले.
"टीएनसीटीसी'च्या कर्मचाऱ्यांनी 2.57 टक्के पगारवाढीची मागणी केली असता सरकारने 2.44 टक्के वाढ देण्याची तयारी दाखविली होती. ती कामगार संघटनांना मान्य नव्हती.
|