नवी दिल्ली - निवडणुकीतील उमेदवारांच्या क्षमता, गुणवत्ता पाहून मतदारांनी मते द्यावीत. लोकशाही व्यवस्थेत जातीच्या आधारावर मतदान करणे योग्य नसल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह कृष्ण गोपाल यांनी आज व्यक्त केले. संघाचे भाजप समन्वयक असलेले गोपाल म्हणाले, की आपल्या देशात जातीमुळे अनेक भेद निर्माण झाले आहेत. जातिभेदाच्या आधारे केला जाणारा भेदभाव समाजातून त्वरित हद्दपार करणे गरजेचे आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये काही लोकांकडून जातीचा उपयोग मतांसाठी केला जातो; मात्र ही बाब अयोग्य आहे. उमेदवाराची निवड जातीवर नव्हे, तर गुणवत्ता आणि पात्रतेवर करावी. ""हिंदुत्वामध्ये नव्या कल्पना, नवे दृष्टिकोन यांचे नेहमीच स्वागत केले आहे. हिंदू धर्मामध्ये कुठल्याही विषयावर वाद-विवाद करण्याची परवानगी आहे. गरीब आणि श्रीमंत अशी दरी समाजात असली तरी ती दूर करण्यासाठी मार्क्सवाद हे उत्तर नाही,'' असे गोपाल म्हणाले.
बाळासाहेब देवरस यांनी लिहिलेल्या "सामाजिक समरसता किंवा हिंदुत्व' या पुस्तकाचे प्रकाशन आज गोपाल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी वरील मत मांडले.
|