नवी दिल्ली : तालिबानसोबत भारताची कतार येथे चर्चा झाल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भारताची तालिबानसोबत भेट हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा होऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं तालिबान ही संघटना दहशतवादी संघटना आहे किंवा नाही? हे केंद्र सरकारनं स्पष्ट करावं, असंही औवेसी यांनी म्हटलं आहे.
सरकार तालिबानसोबत लपूनछपून चर्चा का करत आहे? खुलेपणानं चर्चा का करत नाही? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. त्यामुळं सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. केंद्रानं हे स्पष्ट करावं की ते तालिबानला दहशतवादी संघटना मानतं की नाही? सरकार हे सांगायला का लाजतं आहे? पडद्याआडून बघत बघत ते प्रेम का करताहेत? असे विविध प्रश्नही औवेसींनी विचारले.
पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंधांबाबत बोलताना औवेसी म्हणाले, "पाकिस्तान आणि तालिबानचं असं नात आहे जे कधी संपणार नाही. पाकिस्तानकडून तालिबानला संरक्षण देण्याची गोष्टही भारतानं मान्य केली आहे का? आपण पाकिस्तानला आपल्या देशात चहापाण्यासाठी बोलावतो, बिस्कीटं खायला घालतो. त्यामुळं जर पाकिस्तानला हे सर्व मान्य आहे तर तालिबानलाही भारतात बोलवावं चहा, बिस्कीटं आणि कबाब खाऊ घालावा."
कतारची राजधानी दोहा येथे भारतीय राजदूत दीपक मित्तल आणि तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्तानिकझाई यांची भारतीय दुतावासातच भेट झाली होती. १५ ऑगस्ट रोजी काबूलवर तालिबाननं नियंत्रण मिळवल्यानंतर भारत-तालिबान यांच्यामधील ही पहिलीच अधिकृत भेट होती. या बैठकीत अफगाणिस्तानातील भारतीयांच्या देशवापसीवर चर्चा झाली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.