बुलंदशहर हत्येप्रकरणी तिघांना अटक

बुलंदशहर हत्येप्रकरणी तिघांना अटक

बुलंदशहर : गोहत्येच्या अफवेनंतर उसळलेला हिंसाचार आणि एका पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र अनधिकृत वृत्तानुसार चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. बुलंदशहरची स्थिती पूर्वपदावर येत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक आनंद कुमार यांनी आज पत्रकारांना याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. 

हिंसाचारप्रकरणी आणि हत्येप्रकरणी पंचवीसहून अधिक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ फुटेजच्या आधारावर आरोपींची ओळख पटवली जात आहे. यादरम्यान हिंसाचारात मृत्युमुखी पडलेले पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांची बहीण सुनीता सिंह यांनी भावाच्या हत्येमागे पोलिसांचे षड्‌यंत्र असल्याचा आरोप केला आहे. दादरी गोहत्या प्रकरणाचा तपास सुबोधकुमार सिंह यांच्याकडे असल्याने त्यांची हत्या केली, असा बहिणीने आरोप केला आहे. भावाला हुतात्म्याचा दर्जा द्यावा आणि त्यांचे स्मारक बनवावे, अशी मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री गायीचा वारंवार उल्लेख करतात; मात्र ते स्वतः गोरक्षणासाठी का येत नाहीत, असा सवालही केला. दिवंगत सुबोधकुमार यांचे चिरंजीव अभिषेक यांनी हिंदू- मुस्लिमांच्या वादात वडिलांना आपला जीव गमावावा लागला. आता कोणाच्या वडिलांची वेळ आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. दरम्यान, अतिरिक्त पोलिस महासंचालक (मेरठ विभाग) प्रशांत कुमार यांनी हिंसाचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक केल्याचे सांगितले. या तपासातून हिंसाचाराचे कारण आणि पोलिस अधिकाऱ्याने सुबोध कुमार यांना सोडून पळ का काढला हे समजेल, असे ते म्हणाले. या घटनेतील आरोपींपैकी एक आरोपी बजरंग दलाचा जिल्हा संयोजक योगेश असल्याचे सांगितले जाते, तो अद्याप फरार आहे. 

दरम्यान, बुलंद शहरचे आमदार देवेंद्र लोधी यांनी या घटनेला जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. महाव आणि चिंगरावथी गावात गोहत्येचे प्रकरण उघडकीस आले होते आणि त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. जर पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तर हिंसाचार उसळला नसता, असा दावा त्यांनी केला. 
 

मायावतींचा आरोप 

बुलंदशहर जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचारासाठी भाजप सरकार जबाबदार असल्याचे बसप नेत्या मायावती यांनी म्हटले आहे. प्रत्येक प्रकारच्या हिंसेला आश्रय दिल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. परिणामी कायद्याचे रक्षकही अशा घटनांत बळी पडत आहेत. ही बाब अतिशय चिंताजनक आणि दुःखद असल्याचे त्या म्हणाल्या. 

बजरंग दलाचा इन्कार 

पोलिस निरीक्षकाचा मृत्यू हा पोलिसाच्या गोळीबाराने झाला असून, यात बजरंग दलाचा हात नसल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केला. ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद केले. बजरंग दलाचे कार्यकर्ते दगडफेक करत होते, त्यांनी गोळीबार केला नाही. पोलिसांच्या गोळीबारातच त्यांचा मृत्यू झाला असावा असा आपला संशय आहे, असे सिंह म्हणाले. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष योगेश राज असल्याचे सांगितले जात असून, त्याला अद्याप अटक केलेली नाही. हिंसाचारप्रकरणी 27 जणांविरुद्ध पहाटे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल झाला असून, अन्य 50 ते 60 जणांविरुद्धही गुन्हे दाखल केले आहेत. 

अंत्यसंस्कारास नकार 

राज्य सरकारकडून जोपर्यंत 50 लाखांची मदत मिळत नाही, निवृत्ती वेतन मिळत नाही आणि पोलिसात एकाला नोकरी मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असा निर्णय सिंह कुटुंबीयांनी घेतला आहे.

हिंसाचारात सुबोधकुमार यांच्यासमवेत बळी पडलेले सुमीत कुमार यांच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी त्यांचे वडील अमरजित सिंह यांनी केली आहे. सुमीत (वय 20) यांचा मृतदेह कडक बंदोबस्तात चिंगारवथी येथील घरी आज दुपारी आणला. या वेळी भाजपचे आमदार हजर होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com