नवी दिल्ली : संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरु झाली. तिहेरी तलाक विधेयक हे कोणत्याही धर्म किंवा समाजाविरोधात नाही, असे केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज (गुरुवार) लोकसभेत स्पष्ट केले. तसेच तिहेरी तलाक विधेयक महिलांचे अधिकार आणि त्यांच्या न्यायासाठी असल्याचेही सांगितले.
केंद्र सरकारकडून तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणारे नवे विधेयक दोन दिवसांपूर्वी लोकसभेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर या विधेयकावर आज लोकसभेत दुपारी चर्चेला सुरवात झाली. यादरम्यान तिहेरी तलाक हे अत्यंत महत्त्वाचे विधेयक असून, यावर सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच हे विधेयक संविधानाशी संबंधित असल्याने हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. याशिवाय या विधेयकाचा देशातील 30 कोटी महिलांवर परिणाम होणार असून, त्यांचे रक्षणही महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी खर्गे यांनी मांडलेल्या भूमिकेशी सहमती दर्शवली. खर्गे यांनी मांडलेली भूमिका सर्वच विरोधी पक्षांची असल्याचेही ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.