केरळमधील निधर्मी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न 

केरळमधील निधर्मी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न 

तिरुअनंतपुरम (पीटीआय) : शबरीमलातील अय्यपा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना मुक्त प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या केरळ सरकारच्या भूमिकेला विरोध करणाऱ्यांवर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज टीकास्त्र सोडले. राज्यातील एकता आणि धर्मनिरपेक्षतेचे वातावरण बिघडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. राजकीय स्वार्थापोटी राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही विजयन यांनी केला. 

"शबरीमलातील मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्यावर सरकार ठाम आहे. त्याच वेळी धार्मिक श्रद्धा, विविध धर्मियांच्या पारंपरिक प्रथा आणि पूजेची ठिकाणे आदींचे संरक्षण करण्यास राज्य सरकार बांधिल आहे,'' असे विजयन यांनी स्पष्ट केले. शबरीमलातील मंदिराच्या मुद्यावर राज्य सरकारने न्यायालयात मांडलेल्या भूमिकेबाबत कोणाचे गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी चर्चेस सरकार तयार आहे, असेही विजयन यांनी नमूद केले. 

याप्रकरणी भाजप आणि कॉंग्रेसकडून राजकारण केले जात असल्याचा आरोपही विजयन यांनी केला. शनी शिंगणापूर आणि हाजी अली दर्ग्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महाराष्ट्रातील भाजपचे सरकार करते आहे. त्यामुळे भाजप दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला; तर धर्मांधशक्तींशी हातमिळवणी केल्यास कॉंग्रेसचे मोठे नुकसान होईल, असे विजयन यांनी म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयात याचिका 
शबरीमलातील मंदिरात सर्व वयाच्या महिलांना मुक्त प्रवेश देण्याच्या घटनापीठाने 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय अय्यप्पा भाविक संघटनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाचा हा निर्णय अस्वीकार्ह आणि असमंजसपणाचा असल्याचे याचिकेत म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com