'अमरावती'ची अद्याप वीट रचली नाही

Amravati
Amravati

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर दोन वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीचा शिलान्यास केला असला तरी अद्याप एकही विट तेथे रचली गेलेली नाही. या नव्या राजधानीच्या निर्मितीसाठी तीन वर्षांची मर्यादा आखून देण्यात आली होती, मात्र त्याचे डिझाईन करण्यापलीकडे अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. 

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या महितीनुसार आजच्या तारखेपर्यंत दोन लाख 27 हजार 100 जणांनी 56 लाख 66 हजार 596 विटा नव्या राजधानीच्या इमारतीसाठी दिल्या आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने 25 ऑक्‍टोबर 2014 रोजी राज्याच्या नव्या राजधानीची निर्मिती पाच वर्षांत पूर्ण केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र तीन वर्षांत केवळ तात्पुरत्या स्वरूपातील सचिवालय आणि विधिमंडळाच्या संरचनांमधून दाखविण्यात आले आहे. गेल्या वर्षी 9 ऑक्‍टोबरला मुख्यमंत्री नायडू यांनी जनतेला लिहिलेल्या सार्वजनिक पत्रात पुढील वर्षीच्या विजयादशमीला (यंदाच्या 30 ऑक्‍टोबरला) अमरावतीला निश्‍चित आकार देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र आजच्या तारखेपर्यंत 18.3 किलोमीटरपर्यंतची राजधानीच्या दिशेने जाणारा मुख्य रस्तासुद्धा तयार करण्यात आलेला नाही. सरकारने यंदाच्या फेब्रुवारीत घोषणा केली होती की राजधानीच्या निर्मितीचे काम जुलैत सुरू करून डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. 

नगरपालिकामंत्री पी. नारायण यांनी दोन फेब्रुवारी रोजी कामासाठी नेमकी तारीख सांगितली होती. सचिवालयाच्या निर्मितीचे काम 10 मे रोजी सुरू होऊन 25 डिसेंबर 2018 ला पूर्ण होईल. त्याचप्रमाणे विधिमंडळाच्या इमारतीचे काम 20 जुलै रोजी सुरू होऊन 4 ऑक्‍टोबर 2018 रोजी पूर्ण होईल. उच्च न्यायालयाचे इमारतीचे काम 17 ऑगस्टला सुरू होऊन 3 एप्रिल 2019 रोजी पूर्ण होईल. 

आंध्र प्रदेश सरकारने 25 मार्च 2016 रोजी अमरावती शहराचे मार्स्टर आर्किटेक्‍ट म्हणून मकी असोसिएटची नियुक्ती केली. मात्र कॉन्ट्रॅक्‍ट देईपर्यंत डिसेंबरही निघून गेला. त्यानंतर ब्रिटनच्या फोस्टर प्लस पार्टनरला मास्टर आर्किटेक्‍ट म्हणून नेमले गेले आणि नवीन मुदत देण्यात आली. फोस्टर प्लस पार्टनरला या एप्रिलपर्यंत आपला मास्टर प्लॅन आणि आराखडा सादर करायचा होता. वास्तविक या कंपनीने आपला आराखडा सादर केला असला तरी त्याला थोडा विलंब झाला. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आराखडा मंजूर केला, मात्र नंतर त्यांना तो फारसा प्रभावशाली नसल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी "बाहुबली'चे दिग्दर्शक राजामौली यांचे आराखड्याबद्दल मत घेण्यास सांगितले.त्यामुळे सर्व प्रक्रिाया पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com