नवी दिल्ली : भाजपचे नेते नेहमीच काही ना काही वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात. आतापर्यंत भाजपचे आमदार-खासदार बेजबाबदार वक्तव्य करताना आढळत होते, आता मात्र केंद्रीय मंत्र्यांनीच वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी (ता. 27) एका सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
दिल्लीत सध्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दररोज सभा सुरू आहेत. यातील भाजपच्या एका प्रचारसभेदरम्यान बोलताना, मंत्री अनुराग ठाकूर यांनी 'गोली मारो' असे विधान करण्यास उपस्थितांना प्रवृत्त केले. सभेला उपस्थित असलेल्या लोकांनीही 'देश के गद्दारों को गोली मारो' अशा घोषणा दिल्या आहेत. अनुराग यांनी 'देश के गद्दारों को,' असे म्हणल्यानंतर उपस्थितांमधून 'गोली मारो' अशा घोषणा आल्या. या घोषणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसेच निवडणूक आयोगाने या वक्तव्याची दखल घेतली असून कारवाई होण्याची शक्यता आहे.
अनुराग ठाकूर यांनी प्रत्यक्षपणे गोली मारो हे वक्तव्य केले नसले तरी समोरील लोकांकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांचा उद्देश पूर्ण झाला, असा आरोप त्यांच्यावर होतो. तसेच या देशात कोण गद्दार आहेत आणि कोणाला गोळी मारायला हवी हे ही अनुराग यांनी सांगावे असे सवाल केला जात आहे. अनुराग ठाकूर यांनी यावर स्पष्टीकरण देत, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा व त्यानंतर प्रश्न विचारा अशी प्रतिक्रिया दिली.
उत्तर पश्चिम दिल्लीतील रिठाला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनिष चौधरी यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला भाजपचे मोठमोठे नेते उपस्थित होते. तसेच या सभेनंतर काही वेळाने गृहमंत्री अमित शहा यांचीही त्या ठिकाणी सभा झाली. दरम्यान अनुराग ठाकूर यांच्यासारख्या तरूण नेत्याने असे विधान करावे हे दुर्दैव आहे, असे ट्विट काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांनी केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.