लखनौ : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या खटला जलद गतीने निकाली काढावा, असे आवाहन केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले असून, शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीमध्ये हे होऊ शकते, तर या बहुप्रलंबित प्रश्नावरदेखील अशाच पद्धतीने तोडगा काढायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.
ते येथे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या पंधराव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
प्रसाद म्हणाले, '' रामजन्मभूमीच्या वादाचा मुद्दा जलद गतीने निकाली काढावा, असे आवाहन मी माझ्या वैयक्तिक क्षमतेवर सर्वोच्च न्यायालयास करत आहे. शबरीमला मंदिराच्या बाबतीत हे होऊ शकते, तर मागील सत्तर वर्षांपासून रामजन्मभूमीचा विषय प्रलंबित का आहे?''
विशेष म्हणजे या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयातील न्या. एम. आर. शहा, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गोविंद माथूर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यघटनेचा हवाला देताना प्रसाद म्हणाले की, ''यामध्येही राम, कृष्णाप्रमाणेच अकबराचाही उल्लेख आहे; पण बाबराचा कोठेही उल्लेख दिसत नाही. यामुळे आम्ही त्याची पूजा का करावी?''
खटले निकाली काढा
भविष्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी आखिल भारतीय न्यायीक सेवा व्यवस्था आणण्याचा आग्रहही प्रसाद यांनी केला. गरीब आणि होतकरू लोकांचे खटले तातडीने निकाली काढावेत, असे आवाहनही त्यांनी अधिवक्ता परिषदेकडे केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.