नवी दिल्ली : ''आम्ही जनतेने दिलेला कौल मान्य करतो आणि त्याचे स्वागत करतो. आमच्या पक्षाने या विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केली नाही. मात्र, मध्यप्रदेशातील जनतेचे आम्हाला दिलेल्या पाठिंब्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आता आम्ही मध्यप्रदेशात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे'', असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज (बुधवार) सांगितले.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यात सत्ताधारी भाजप पराभवाच्या छायेत असून, काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही राज्यांत काँग्रेस किंवा भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र, काँग्रेसकडून आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी समाजवादी पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दर्शवला आहे.
याबाबत अखिलेश यादव यांनी सांगितले, की ''आमच्या पक्षाने या विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केली नाही. मात्र, मध्यप्रदेशातील जनतेचे आम्हाला दिलेल्या पाठिंब्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. आता आम्ही मध्यप्रदेशात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून लोकांमध्ये द्वेष आणि धोक्यासारख्या बाबी पसरविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जनताच त्यांना उत्तर देईल''.
दरम्यान, बहुजन समाज पक्षाच्या सर्वसर्वा मायावती यांनी काँग्रेसला पाठिंबा असल्याचे काल (मंगळवार) सांगितले होते. त्यानंतर आता अखिलेश यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.