नवी दिल्ली : राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेत विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी, ‘‘तुम झूठ को सच लिख दो ,अखबार भी तुम्हारा है’’ , या काव्यपंक्ती उधृत करून लोकशाही कधी नव्हे इतकी धोक्यात असल्याचे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांच्या सरकारच्या अनेक आश्वासनांवर आज चौफेर हल्ला चढविला. महागाई आहे, बेरोजगारीने कळस गाठला आहे, आत्महत्या होतच आहेत. पण मग ‘अच्छे दिन कोठे गेले’ असा सवाल केला.
राज्यसभेत आज अभिभाषणावरील चर्चा सुरू झाली. उद्यापासून प्रश्नोत्तरांनंतरचा वेळ चर्चेसाठी दिला जाणार असून नियोजनानुसार ८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान चर्चेला उत्तर देतील. कोरोना गैरव्यवस्थापन, खोटी आश्वासने, ध्रुवीकरणाने निवडणूका जिंकण्याचा हातखंडा प्रयोग अशा विविध मुद्यांवरून सरकारची पिसे काढणारे खर्गे यांनी, माझ्या पक्षाचा वेळ मी ठरवेन, तुम्ही नव्हे असे भाजप नेत्यांना सुनावले. जर दरवर्षी २ कोटी रोजगार तुम्ही देणार होता तर देशात आज इतिहासातील विक्रमी बेरोजगारी का आहे, प्रत्येक बाबतीत कोरोनाआड लपण्याचा प्रकार होऊ नये, अशीही भावना त्यांनी मांडली. राष्ट्रपतींचे भाषण निवडणूक प्रचाराचे भाषण वाटते, असे सांगताना खर्गे म्हणाले की अभिभाषणात गरीब, बेरोजगार, महागाईने होरपळणारा सामान्य माणूस, शेतकरी यांच्यासाठी काही तरी दिलासा असेल अशी अपेक्षा होती. पण महागाई-बेरोजगारीचा साधा उल्लेखही भाषणात नाही.
पीएम केअर फंडाचा हिशोब तर तुम्हाला द्यावाच लागेल. ते म्हणाले, की तुम्ही आज सत्य बोलू देत नाही, सत्य लिहू देत नाही, जो सत्य बोलतो त्याला देशद्रोही लेबल लावता. २०१४ पासून दरवर्षी २ कोटी याप्रमाणे १५ कोटी रोजगार द्यायला हवे होते, प्रत्यक्षातील चित्र असे की बेरोजगारीच्या खाईत सारा देश होरपळत आहे. दोन कोटींहून जास्त लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तुमच्याकडून शेतकरीही फसवला गेला आहे व युवक नोकरीसाठी लाठ्या खात आहेत.
खर्गे म्हणाले, की ७० वर्षांत तुम्ही काय केले असा तुमचा प्रश्न असेल तर त्याला उत्तर हे, की आम्ही काहीच केले नसते तर तुम्ही जिवंतही दिसला नसतात. आम्हीच लोकशाही व घटना जपून ठेवलेली आहे त्यामुळेच तुम्ही लोक येथे आहात. विरोधक जेव्हा कामकाजाबाबत प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला धर्म धोक्यात आल्याचा साक्षात्कार होतो असे सांगताना खर्गे यांनी, महात्मा बसवेश्वर यांच्या कन्नड काव्यपंक्ती उधृत केल्या.
कोण काय म्हणाले
राम गोपाल यादव: सत्तेवरील उच्चपदस्थच प्रचारात धार्मिक भावना भडकावतात हे लोकशाहीसाठी भयानक आहे. उत्तर प्रदेशात सप सत्तेवर आला तर भाजप पेक्षा कमी वेळात अयोध्येत राम मंदिर बांधेल.
विकास रंजन भट्टाचार्य (माकप): संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले कृषी कायदे टीव्हीवर येऊन तुम्ही रद्द केले तेव्हा संसद तर दूर, पण स्वतःच्या मंत्रिमंडळालाही अंधारात ठेवले. हुकूमशाही यापेक्षा दुसरी काय असते.
तिरुची सीवा (द्रमुक) : बहुमताच्या बळावर तुम्ही प्रत्येक आवाज दाबून टाकत आहात पण लक्षात ठेवा, भारताची जनता शांत दिसत असली तरी २०२४ मध्ये तुम्हाला सारी उत्तरे मिळणार आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.