गुवाहाटी : आसाममध्ये पूरस्थिती अद्याप गंभीरच असून पुरामुळे गेल्या २४ तासांत आणखी १२ जणांचा मृत्यू झाला. राज्यात ५४.५ लाख जणांना पुराचा फटका बसला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून सुरु असलेल्या पुराच्या थैमानात आतापर्यंत १०१ जणांचे बळी गेले आहेत. आसाममधील ३६ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून ब्रम्हपुत्रा, बराक आदी नद्यांना अजूनही पूर असून राज्यातील काही भागांत मात्र पूर ओसरत आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएने आतापर्यंत २७६ नौकांच्या मदतीने ३,६५८ जणांची सुखरूप सुटका केली आहे. एनडीआरएफ पूरग्रस्त १२ जिल्ह्यांत ७० नौका आणि ४०० जवानांच्या मदतीने बचावकार्य राबवीत आहे. आसाममधील कामरूप, बारपेटा, होजाई, नलबारी, दरांग, तामूलपूर कच्चर आदी जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफकडून मदत व बचावकार्य राबविले जात आहे.
राहुल, प्रियांकांचे मदतीचे आवाहन
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आसाममधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. ‘आसाममध्ये पुरात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटंबींयाप्रति संवेदना व्यक्त करतो. काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी आसाममध्ये बचावकार्य सुरू ठेवावे’, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. प्रियांका गांधी यांनीही हिंदीतून ट्विट करत काँग्रेस कार्यकर्त्यांना आसाममधील नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्यचे आवाहन केले.
पुराची सद्य:स्थिती
५४ लाख - फटका बसलेले नागरिक
१०१ - एकूण मृत्यू
१ लाख हेक्टर पिकांचे नुकसान
५००० - प्रभावी गावे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.