admissions
admissionssakal

अकरावी प्रवेशासाठी शेवटची संधी

विद्यार्थी प्रवेशाची प्रक्रिया ३१ ऑक्‍टोबरला होणार पूर्ण

पुणे : तुम्ही अद्याप इयत्ता अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहात?, आतापर्यंत कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेतलेला नाही किंवा मिळालेला नाही का?, याचे उत्तर ‘होय’ असेल, तर इकडे नक्की लक्ष द्या! आता तुम्हाला अकरावी प्रवेशाची शेवटची संधी मिळणार आहे. त्यासाठी ‘विशेष प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (एफसीएफएस) फेरी राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शेवटची फेरी असून ही प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबरला पूर्ण होणार असल्याचे राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने स्पष्ट केले.

राज्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच महापालिका क्षेत्रात अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार (एफसीएफएस) फेऱ्यांचे आयोजन केले आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर केला. तसेच, अद्याप प्रवेश अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष एफसीएफएस फेरी राबविण्यात येत आहे.

सध्या प्रथम सत्र पूर्ण होत असून सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होणे गरजेचे असल्याने आता पुरवणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची फेरी असणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले.

प्रवेश फेरीचे वेळापत्रक

कार्यवाही : नवीन नोंदणी, प्रवेश अर्ज भाग एक भरणे, अर्ज प्रमाणित करणे, प्रवेश रद्द करणे, कोट्यांतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करणे

कालावधी : ३० ऑक्टोबर (दुपारी १२ वाजेपर्यंत)

कार्यवाही : दहावी उत्तीर्ण, एटीकेटी लागू असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी एफसीएफएस अंतर्गत अर्ज करून ऑनलाइन ॲलॉटमेंट मिळविणे

कालावधी : ३० ऑक्टोबर (दुपारी १२ वाजेपर्यंत)

कार्यवाही : ॲलॉटमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करणे, कोटा प्रवेश आणि द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू राहतील

कालावधी : ३० ऑक्टोबर (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

कार्यवाही : निश्चित केलेले प्रवेश पोर्टलवर नोंदविण्यासाठी महाविद्यालयांसाठी अतिरिक्त वेळ

कालावधी : ३० ऑक्टोबर (रात्री ८ वाजेपर्यंत)

सहभागी होण्यासाठीची पात्रता

या फेरीमध्ये दहावी उत्तीर्ण असलेले सर्व तसेच एटीकेटी सवलत मिळालेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी या शेवटच्या फेरीमध्ये आपले प्रवेश निश्चित करावेत, यासाठी वेळेत ऑनलाइन अर्ज भरणे, प्रवेश अर्ज भाग एक व्हेरिफाय करणे, ॲलॉटमेंट घेऊन प्रवेश निश्चित करणे, अशी सर्व कार्यवाही वेळेत पूर्ण होईल, याची दक्षता संबंधित विद्यार्थी, मार्गदर्शन केंद्र व उच्च माध्यमिक विद्यालयांनी घ्यावी, असेही शिक्षण विभागाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com