
MPSC : परीक्षा पुन्हा घेण्याचा एमपीएससीचा निर्णय; कौशल्य चाचणी सर्वांना बंधनकारक
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत कर सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी सात एप्रिल रोजी कौशल्य चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी काही उमेदवारांना परीक्षा देण्यास तांत्रिक अडचण आली होती.
मात्र एमपीएससीने सरसकट सर्व उमेदवारांसाठी बुधवारी (ता.३१) पुन्हा कौशल्य चाचणी आयोजित केली आहे. यावर उमेदवारांनी संतप्त भावना व्यक्त करीत पुन्हा अडचण काही तांत्रिक अडचण आल्यास तिसऱ्यांदा परीक्षा घेणार का, असा तिरकस सवाल केला आहे.
गेल्या वर्षी गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती व काही दिवसांपूर्वीच परीक्षेचा कौशल्य विकास चाचणीचा शेवटचा टप्पा पार पडला होता. कट -क अंतर्गत सहाय्यक पदाच्या २८५ तर लिपिक व टंकलेखक पदांसाठी एक हजार ७७ जागांसाठी आयोगाकडून परीक्षा घेण्यात आली होती.
जवळपास एक वर्ष या परीक्षेची प्रक्रिया सुरू आहे. आधीच परीक्षेची प्रक्रिया लांबली जात असताना पुन्हा काही उमेदवारांसाठी करता सर्वांना परीक्षा द्यावी लागणे हे अन्यायकारक आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा देणार नाही, अशी भूमिका या परीक्षेच्या उमेदवारांनी घेतली होती. मात्र एमपीएससीने उमेदवारांच्या मागणीला न जुमानता पुन्हा एकदा परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले.
आयोगाने अट्टहास सोडावा
परीक्षा पुन्हा न देण्याच्या उमेदवारांच्या भूमिकेला काही राजकीय नेत्यांनीही आयोगाला पत्र लिहून पाठिंबा दिला होता. मात्र आयोगाने ताठर भूमिका घेताना कोणाला जुमानले नाही. गेली अनेक वर्षे आम्ही अभ्यास करतोय. आयुष्य पणाला लावून आम्ही इथपर्यंत पोहचलो आहे. ज्यांना कोणाला तांत्रिक अडचण आली असेल त्यांची व्यवस्थित पुन्हा परीक्षा घ्यावी. मात्र सर्वांनी पुन्हा परीक्षा देण्याचा अट्टहास आयोगाने धरू नये, अशी विनंती उमेदवारांनी आयोगाकडे केली आहे.
यावर्षी कौशल्य विकास चाचणीमध्ये आयोगाने मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. त्याला अनुसरून आम्ही ७ एप्रिल रोजी परीक्षा दिली. आयोगाने दुसऱ्यांदा परीक्षा घेण्याचा घाट घातला आहे. मात्र त्यावेळी तांत्रिक अडचण आली किंवा जे उमेदवार आधीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले होते ते आता अनुत्तीर्ण झाले तर आयोग पुन्हा परीक्षा घेणार का?
- राज बिक्कड, विद्यार्थी