परदेशी शिकताना : करिअरसाठी क्षेत्र निवडताना

सध्या तुम्ही दहावी-बारावी व पदवीनंतर आता पुढे काय? या प्रश्नावर विचार करत असाल ना. कित्येक जण गुगलच्या मदतीने माहिती शोधत असतील तर अनेकांनी विचारही केला नसेल.
Abroad Education
Abroad Educationsakal

- ॲड. प्रवीण निकम

सध्या तुम्ही दहावी-बारावी व पदवीनंतर आता पुढे काय? या प्रश्नावर विचार करत असाल ना. कित्येक जण गुगलच्या मदतीने माहिती शोधत असतील तर अनेकांनी विचारही केला नसेल. निकाल लागल्यानंतर बघूया, या विचारात उन्हाळ्याची सुट्टी अनुभवत असतील. बदलत्या काळात पारंपरिक शिक्षणासोबतच कौशल्याधारित शिक्षण आवश्यक आहे. ही वाट कशी निवडावी? हे आज आपण पाहूया.

स्वतःला ‘का’ प्रश्न विचारा

आपल्याला एखाद्या क्षेत्राची आवड असल्यास ती खरंच का आहे? यातही कोणते क्षेत्र आवडीचे आहे? हे करिअर केल्यानंतर आपल्याला समाधान मिळणार आहे का? की अन्य कोणी सांगत आहेत म्हणून आपण यावर विचार करतोय. या सर्व प्रश्नांची ठाम उत्तरे मिळवण्यासाठी स्वतःशीच संवाद साधावा. यात आपली बलस्थाने व कमतरता, आर्थिक, शारीरिक क्षमता व बौद्धिकता ओळखून योग्य निर्णय घ्यायला मदत होते. वेगाने बदलणारी भोवतालची परिस्थिती, स्पर्धेचे वाढते युग आणि इतर दबाव या सगळ्यात स्वतःवर विश्वास निर्माण व्हावा.

संवाद महत्त्वाचा

करिअरच्या दृष्टीने विचार करताना स्वतःशी संवादासोबत संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. संवाद साधत असताना करिअर करण्यासाठी भारतात व परदेशात अनेकविध संधी उपलब्ध असल्याचे लक्षात येते. यातही कोणते महाविद्यालय चांगले? कुठून योग्य प्रशिक्षण मिळू शकते? त्या क्षेत्रातील सखोल माहिती असल्यास शिक्षण अधिक सकस होण्यासाठी वाट मोकळी होते. यातून आपण पुढच्या पाच-दहा वर्षांत कुठे असू आणि असायला हवे याविषयी अंदाजे चित्र तयार होते.

आपली प्रेरणा, उद्दिष्ट निश्चित करा

आपल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे. त्या क्षेत्रातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती कोण आहेत? त्या ध्येयापर्यंत कशा पोहोचल्या? याविषयी माहिती मिळवावी. याआधारे वाचनाकडे कल निर्माण होऊन चिकित्सक वृत्ती तयार होते. भविष्याची वाटचाल करत असताना मानसिक, शारीरिक व कष्टाची तयारी असणे, ही गरज आहे.

नोकरी/व्यवसाय की अजून काही

आजकाल करिअरपेक्षा जॉबला खूप महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळे आपल्याला किती पगार मिळतो यापेक्षा किती समाधान मिळते‌ ही महत्त्वाचे आहे. कदाचित एखाद्या ठिकाणी आकर्षक पगार असू शकतो परंतु समाधान व आनंद मिळणार नसल्यास उपयोग नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात जायचे आहे त्यामध्ये संधीच्या वाटा कोणत्या आहेत? हे जाणून घ्या.

कौशल्याची जोड

उच्च शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे. तर, उच्च शिक्षण म्हणजे विचार करण्याच्या नवीन पद्धती शिकणे आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये आत्मसात करणे. पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार प्रणाली, विश्लेषण, लेखी आणि मौखिक संप्रेषण आणि गट समस्या सोडविण्याचे कौशल्य हे आत्मसात व्हायला हवेत.

योग्य मार्गदर्शन व नियोजन

विशिष्ट संकुचित चौकट मोडून मुलांमध्ये करिअर विषयीचा आत्मविश्वास व निर्णयक्षमता निर्माण व्हावी.‌ या वयात मुलांना करिअर विषयक योग्य सल्लागाराची आवश्यकता असते. यासाठी पालकांनी जागरूक असावे.

(लेखक समता सेंटर या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com