आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारायचे असल्यास विविध व्यवसाय कौशल्ये शिकून घेण्याची गरज आहे. ज्यांना लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, असे वाटते त्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर पारंपरिक आर्ट्स, कॉमर्स , सायन्स या शाखांऐवजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून तांत्रिक कौशल्ये अर्थात ‘आयटीआय’ शिकणे उपयुक्त ठरते. दहावीच्या निकालानंतर यासंबंधीची सविस्तर जाहिरात वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होते. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एक व दोन वर्षांचे कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्यामध्ये गवंडी, प्लंबर, सुतार, फौंड्रीमन, रंगारी, जोडारी, वीजतंत्री, यंत्र कारागीर, सर्वेक्षण, बांधकाम, टूल व डाय मेकिंग, मशिन टूल्स अशा विविध कोर्सेसचा समावेश होतो. येथील अभ्यासक्रम उद्योगधंद्यातील तज्ज्ञांनी बनवला असून, अभ्यासक्रम बनवताना कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या कौशल्यांचा विचार केला गेला आहे.
या संस्थांमधील शिक्षण अत्यंत माफक खर्चात होते आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर औद्योगिक आस्थापनांमध्ये वापरण्यात येणारी यंत्रसामग्री व तंत्र यांचे ज्ञान व कौशल्य प्राप्त करून विद्यार्थी सर्व दृष्टीने पूर्ण कुशल व्हावा यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना अस्तित्वात आली आहे, ज्यामुळे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला औद्योगिक आस्थापनांमध्ये वर्षभर प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळते आणि या प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांना विद्यावेतन ही मिळते. बजाज, टाटा, महिंद्र, भारत फोर्ज अशा विविध संस्थांच्या सहकार्याने काही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण सुविधांचा दर्जावाढ करणे, अद्ययावत यंत्रसामग्री व उपकरणे उपलब्ध करून देणे, ऑन द जॉब ट्रेनिंग देणे, कुशल प्रशिक्षक पुरवणे या गोष्टी केल्या जातात.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या दोन वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या दोन भाषा विषयांची परीक्षा उत्तीर्ण केल्यास विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येणार आहे. ‘आयटीआय’चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकतो. आणि पदविका अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकतो. आयटीआय अभ्यासक्रम औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रशिक्षणासह पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतात. खासगी आस्थापनांबरोबरच महावितरण, रेल्वे, एसटी अशा सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. दहावीनंतर आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया, उपलब्ध संस्था, त्या संस्थांमध्ये उपलब्ध कोर्सेस या सर्व गोष्टींची माहिती www.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होते.
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.