#FamilyDoctor दीपावलीची तेजोपासना

#FamilyDoctor दीपावलीची तेजोपासना

प्रकाशाच्या पूजेला आपल्या संस्कृतीत अत्युच्च स्थान आहे. केवळ दिव्याचेच नाही, तर आपल्या संस्कृतीत यज्ञ संकल्पनेचाही विकास झालेला आहे. सूर्य हा प्रकाशाचा मूळ स्रोत आहे. जणू सूर्य हा विश्वाचा सर्वांत मोठा दिवा आहे. दीपावलीचा उत्सव आनंद देणारा, शुभ, कल्याणकारी आहे. दीपावलीच्या दिवसांत कोणी एकटे राहू नये, अंधारात राहू नये हे पाहिले जाते. या दिवसांत सर्वांबरोबर खाणे-पिणे, संगीत वगैरेंचा आनंद घेतला जातो. 

माझ्याकडून आपणा सर्वांना दीपावली महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रथम प्रार्थना करून तेजाचे महत्त्व बघू. 
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।
 शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ।।

संध्याकाळी दिवा लावून प्रत्येक घरात, भारतीय संस्कृतीचा प्रत्येक सदस्य ही प्रार्थना करतो. जगभरात सर्व ठिकाणी व सर्व धर्मात दिवा लावणे शुभ मानले गेलेले आहे. जन्मदिवशी दिवा लावला जातो, तसेच घरात कुणाचा मृत्यू झाला तरी दिवा लावला जातो. देवापुढे दिवा लावला जातो, तसेच मृत व्यक्‍तीसाठीही दिवा लावला जातो. भारतीय संस्कृती ही अत्यंत प्रगत झालेली संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीत तुपाचा दिवा लावण्याची पद्धत आहे. 

दीपावली शब्दातील आवली या शब्दाचा अर्थ आहे रांग वा ओळ. भारतात असलेल्यांची संस्कृती ती भारतीय संस्कृती. भा-रत म्हणजे तेजात समर्पण. हा भारतीय संस्कृतीचा अत्युच्च बिंदू आहे. अंधार असला तर भीती वाटते. भीती म्हणजेच मृत्यू. जो कोणी घाबरत असतो तो कणाकणाने मरत असतो. अंधारापासून दूर राहण्यासाठी हवा प्रकाश. प्रकाशाच्या पूजेला आपल्या संस्कृतीत अत्युच्च स्थान आहे. केवळ दिव्याचेच नाही तर आपल्या संस्कृतीत यज्ञ संकल्पनेचाही विकास झालेला आहे. सूर्य हा प्रकाशाचा मूळ स्रोत आहे. जणू सूर्य हा विश्वाचा सर्वांत मोठा दिवा आहे. ध्यान व कर्म यामध्ये महत्त्वाची ठरते संतुलन ‘सोम साधना’, ज्यात अग्नी हा केंद्रबिंदू आहे.

कार्तिक महिन्यात दिव्यांचा महोत्सव केला जातो - हीच दीपावली. केवळ आपल्या संस्कृतीतच नाही, तर संपूर्ण जगात हा दिव्यांचा महोत्सव झाला पाहिजे. दीपावलीच्या काळात दिव्यांची पूजा केली जाते. याचा आनंद लुटण्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी वगैरेंना आमंत्रित केले जाते. मनुष्य हा संघप्रिय आहे. अश्‍मयुगात मनुष्य एकेकटा राहात असे, परंतु पुढे मनुष्याने संघटित राहणेच स्वीकारले. आजही पती-पत्नी व त्यांची दोन मुले असे मिळून कमीत कमी चार व्यक्‍ती एकत्र राहतातच. एवढेच नाही, तर यांच्याभोवतीही नातलग वगैरे गोतावळा जमतो. नात्यांमुळेच आपले जीवन फुलते. नात्यांमध्ये ताण आला तर तंटे होतात, विनाशाकडे वाटचाल सुरू होते. तर नातेसंबंध फुलले तर प्रकाशाकडे वाटचाल होते. नातेसंबंध असतील तर त्या प्रकाशात पर्यायाने जीवनातही आपली वाटचाल व्यवस्थित होते.  

म्हणून दीपावलीचा महोत्सव साजरा करण्यासाठी पाहुण्यांना आमंत्रित केले जाते. या उत्सवाची सुरवात होते वसुबारसेपासून. आपल्या आत असलेले पशुत्व मानवतेत परिवर्तित करण्याच्या हेतूने व आपल्यात असलेले पशुत्वसुद्धा पूजनीय व्हावे, या हेतूने वसुबारसेच्या दिवशी सवत्स गाईची पूजा केली जाते. यानंतर येणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा. नंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीचे आवाहन केले जाते. यानंतर सुरू होते नवे वर्ष. जीवनाच्या मिलनाचा व पतीपत्नींच्या प्रेमाचा उत्सव व त्यानंतर भाऊ-बहीण हा सख्ख्यांचा उत्सव. वसुबारसेला गोधन पूजेच्या वेळी प्रसादात बाजरी-गूळ यांतील अग्नी, धनत्रयोदशीच्या दिवशी घर ज्याने सुशोभित केले आहे अशा दिव्यांचा व आकाशकंदिलाचा अग्नी, नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी फटाक्‍यांचा अग्नी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आरती, फटाके यांचा अग्नी आणि नवीन वर्षी पाडव्याला चेतवलेला जाठराग्नी व मित्रमंडळींत वाटलेली प्रेमाची ऊब. पाडवा, भाऊबीज या दिवशी शरीरातील अग्नीला चेतवण्यासाठी ओवाळण्याचे महत्त्व. हा दीपावली उत्सवाचा सर्वोच्च मानबिंदू.

याप्रमाणे दीपावलीचा उत्सव आनंद देणारा, शुभ, कल्याणकारी आहे. दीपावलीच्या दिवसांत कोणी एकटे राहू नये, अंधारात राहू नये हे पाहिले जाते. या दिवसांत सर्वांबरोबर खाणे-पिणे, संगीत वगैरेंचा आनंद घेतला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com